चला करूया चिखलधुणी !
२६ जुलैला कुडाळ प.स. राबविणार अनोखा उपक्रम
होणार शेतकरी संस्कृतीचे दर्शन
आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा मेळ
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही गावांनी जपून ठेवलेली एक परंपरा म्हणजे चिखलधुणी ! शेतीची काम पूर्ण झाल्यांनतर जनावर, काळी आई, शेती अवजारं यांच्याप्रती एकार्थाने कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे चिखलधुणी. हा एक आगळावेगळा उपक्रम कुडाळ पंचायत समिती आणि हुमरमळा अणाव ग्राम पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मॉन्सून महोत्सवाअंतर्गत येत्या बुधवारी २६ जुलैला शेतकरी न्हानु पांडुरंग पालव याच्या शेतावर राबवण्यात येणार आहे. यावेळी वनशौधी बाग आणि बांबू लागवड शुभारंभ सुद्धा केला जाणार आहे. आपल्या नवीन पिढीला आधुनिक शेतीसोबतच पारंपरिक शेतीची माहिती व्हावी हा या मॉन्सून महोत्सवाचा उद्देश आहे. त्यासाठी लुप्त होत असलेल्या शेतीच्या पारंपरिक गाण्यांची मजा सुद्धा नवीन पिढीला घेता येणार आहे. अशी माहिती कुडाळचे गट विकास अधिकरी विजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत चिखलधुणी हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हात प्रथमच बुधवारी 26 जुलैला सकाळी 9 वाजता अणाव हुमरमळा येथे राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारपरिक शेती व दुसरी आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाणार आहे. नवीन पिढी मातीपासून दूर गेली त्यांची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी हा यामागचा उदात्त हेतू आहे. तसेच हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या 2 हेक्टर जागेत विविध अशा १५० वनौषधीचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारत आहे. त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बाबू व फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमानी चिखलधुणी साजरा केला जाणार आहे अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी यावेळी दिली
याबाबत बोलताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, भारत हा शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी क्षेत्रात सुधारित कृषी तंत्रज्ञान व संशोधन आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करून क्रांती केली आहे. पावसाळ्यात कोकणात प्रामुख्याने भात हे मुख्य पीक घेतले जाते, भात पिकातही सुधारित संकरित वाण आणि यात्रिकीकरण यादवारे मोठी प्रगती झाली आहे शेतकरी कमीत कमी क्षेत्रात संकरित वाण व यांत्रिकीकरणाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत. तरीही पौष्टिकता आणि औषधीय गुणधर्माच्या उपलब्धतेमुळे आजही जुन्या पारंपारिक वाणाच्या भाताचे आहारातील महत्त्व वाढले आहे.असे असले तरीही वाढते शहरीकरण व झपाट्याने कमी होणारी श्रमप्रतिष्ठा, शेतीत काम करणारे मनुष्यबळ कमी होत असल्याने दरवर्षी भात पिकाखालील क्षेत्र घटत आहे. म्हणूनच भात शेती करणारा आपला बळीराजा किती कष्टाने शेती पिकवतो याची ओळख नोकरदार बंधू-भगिनींना व्हावी, शेतकऱ्यांबद्दल मनात आदरभाव निर्माण व्हावा जिला आपण माता संबोधतो त्या मातीशी संपर्क वाढावा म्हणून आम्ही पंचायत समिती कुडाळचे सर्व कर्मचारी २६ जुलैला एक दिवस शेतकऱ्याच्या शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने स्थानिक वाण आणि श्री पद्धतीने सुधारित वाणाच्या भात रोपांची लावणी करून शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत.
१५० वनौषधींची लागवड करणार
पुढे बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, आयुर्वेदात असं म्हटलं की ज्या भौगोलिक क्षेत्रात आपण राहतो तिथे होणाऱ्या आजाराचं औषध तिथल्याच मातीत रुजून येतं, म्हणजे त्या त्या भागातील वनौषधी तिथल्या भागात होणान्या आजारांवर उपचार ठरतात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या पिढीला या वनौषधींचे ज्ञान होते. म्हणूनच हा प्रकल्प साकारत आहोत. पुढील पिढीला आपला हा समृद्ध वनौषधीचा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे.आम्हाला वाटत की ही महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत क्षेत्रात केलेली पहिली वनौषधीची बाग असेल.
नरेगा अंतर्गत बांबू आणि फळबाग लागवड शुभारंभ
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड व बांबू लागवड यामध्ये कुडाळ तालुका नेहमी अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच चालू वर्षाच्या लागवडीचा शुभारंभ सुद्धा आम्ही याच दिवशी हुमरमळा अणाव या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करणार आहोत. मागील वर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना याअंतर्गत चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांचा सत्कारही आयोजित केला आहे.
शेतकरी संस्कृतीचे होणार दर्शन
बीडीओ श्री. चव्हाण पुढे म्हणाले, शेतकरी न्हानु पांडुरंग पालव याच्या शेतावर हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे शेतकरी राजा नटून थटून शेताच्या बांधावर असणार आहे. यावेळी पूर्वी शेतात गाणी गाण्याची पद्धत होती तो गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गेले पंधरा दिवस माझ्या मागदर्शनखाली सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, दत्ताराम आंबेरकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, संजय आरोस्कर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, गीता चेदवणकर, धनश्री परब, समीरा केरकर, गणेश राठोड, महादेव खरात, प्रशासक संदेश परब, कांचन कदम आदींनी यासाठी मेहनत घेतली आहे. राज्यात अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम असेल असेही श्री चव्हाण यांनी सागितले
जि प सीईओ सह अधिकाऱ्यांची उपस्थिती
चिखलधुणी म्हणजे शेतकऱ्याचा आंनदोत्सव असून या सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस जिल्हा कृषी विकास अधिकारी जानबा झगडे नरेगा गटविकास अधिकारी विरेश अंधारी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.