तिमिरातुनी तेजाकडे चळवळीतील विद्यार्थी कु. प्रथमेश विठ्ठल गुगद्धडी, रा. नाटे, राजापूर याचे अग्निवीर परीक्षेत यश

सिंधुदुर्ग : “जिथे उभा राहील तिथे चिंतन, जिथे मार्गदर्शन करेल तिथे परिवर्तन” हे ब्रीदवाक्य असणारे, कोकणचे भूमिपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते स्वरूपात स्पर्धा परीक्षांचा झंजावात निर्माण करणारे, माननीय श्री. सत्यवान यशवंत रेडकर, शासकीय नोकर भरतीतील कोकणातील टक्का वाढावा यासाठी शैक्षणिक चळवळीद्वारे कार्यरत आहेत.
राजापूर तालुक्यातील तिमिरातुनी तेजाकडे या चळवळीतील विद्यार्थी कु. प्रथमेश विठ्ठल गुगद्धडी, रा. नाटे, राजापूर यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या अग्निवीर परीक्षेत स्वयंअध्ययन करून यश प्राप्त केले आहे. अत्यंत साधारण परिस्थितीत बारावीची परीक्षा संपल्यानंतर मैदानी तसेच लेखी चाचणीची प्रॅक्टिस करून अंतिम वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने आपल्या करियर मधील पहिले पाऊल टाकल्याचे समाधान व्यक्त केले. ” रेडकर सर आपण भालावली येथे केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही यशाची पहिली पायरी गाठू शकलो, तुम्ही विद्यार्थ्यांना असेच मार्गदर्शन करावे, तुमच्यासारखे व्यक्ती समाज घडवू शकतात, शासकीय पदांवर योग्य व्यक्ती व देशाचे हितचिंतणारे आपल्यासारखे व्यक्ती जेव्हा निवडून येतील तेव्हा समाज सुधारणा होण्यास व देशाला महाशक्ती बनण्यास फार वेळ लागणार नाही असे प्रतिपादन निवड झालेले विद्यार्थी कु. प्रथमेश विठ्ठल गुगद्धडी यांच्याद्वारे करण्यात आले.
येत्या काही वर्षात अशाच प्रकारे कोकणातील विद्यार्थ्यांनी मनन, चिंतन, आत्मविश्वास दाखवून कोणताही क्लास किंवा अकॅडमी न लावता प्रयत्न केले तर नक्कीच कोकणामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याद्वारे मिळणारे आशीर्वाद व त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू ही माझ्या कार्याची पोचपावती असे सांगत श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.
ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग