कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार !

आमदार वैभव नाईक यांचे बांधकाम कामगार संघटनेला आश्वासन

प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा दृष्टिकोनातून येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन आम वैभव नाईक यांनी  बांधकाम कामगार संयुक्त संघटना कृती समिती सिंधुदुर्गच्या शिष्टमडळाला दिली.   विविध प्रश्नाबाबत आमदार  नाईक यांचे निवेदन द्वारे लक्ष वेधले.
   सिंधूदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत हे प्रश्‍न शासन दरबारी तसेच इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी बांधकाम कामगार संयुक्त संघटना कृती समिती कार्यरत आहे. दरम्यान या संघटनेचे पदाधिकारी नेते बाबल नादोसकर, अशोक बाबलेकर, अनिल कदम, विनायक मेस्त्री, प्रकाश चव्हाण,  मंगेश नारिंग्रेकर, लक्ष्या मेस्त्री आदीनी आमदार  नाईक यांची शिवसेना कुडाळ कार्यालयात भेट घेतली. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजना जाहीर आहेत. सदर योजनांचे लाभ सहजरित्या मिळावेत यासाठी ऑनलाइन प्रणाली चालू झाली. परंतु कामगारांच्या अडचणी मात्र कमी होण्याऐवजी वाढलेल्या दिसून येतात. सरकारी कामगार कार्यालय तसेच नव्याने चालू झालेले कामगार सुविधा केंद्र ह्या दोन्ही ठिकाणाहून कामगारांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कामगारांची निराशा झालेली आहे. कामगारांची नवीन नोंदणी जवळपास ५ ते ६ महीने काम रखडलेली आहेत. तसेच ऑनलाइन नूतनीकरण (री डाटा एंट्री) चे ऑनलाइन अर्ज हे बऱ्याच महिन्यांपासून मंजूरी साठी प्रलंबित आहेत. त्यामुळे बऱ्याच कामगारांना त्यांच्या मिळणाऱ्या लाभापासून उपेक्षित राहावे लागत आहे. ज्यांची ऑनलाइन नूतनीकरण (री डाटा एंट्री) झालेली नाही अशा कामगारांना ३ वर्ष लाभ मिळालेला नाही. त्यावर सरकारी कामगार अधिकारी व कर्मचारी यांचेकडे यावर समर्पक उत्तर नाही. तसेच शिष्यवृत्ती व अन्य आर्थिक लाभ हे ३ ते ४ महीने प्रलंबित आहेत. तसेच अर्ज मंजूर होऊन देखील लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यात जमा होत नाहीत. मोठ्या रक्कमेचे लाभ हे १ वर्ष होऊनसुद्धा प्रलंबित आहेत. तसेच कामगारांना नूतनीकरण होण्यासाठी आवश्यक असलेल्या काम केल्याच्या दाखल्याच्या बाबतीतही कामगारांची हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील कामगार हे बहुतांश ग्रामीण भागातून असल्यामुळे प्रत्येक कामगार हा नोंदणीकृत विकसकांकडे काम करत नसून नाका कामगार म्हणून काम करतो. अशा कामगारांना ग्रामसेवक यांचा दाखल आवश्यक आहे परंतु ग्रामसेवक देखील सदर कामगारांना अनावश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट ठेवतात अशी कागदपत्रे सादर न करू शकलेमुळे कामगारांची नूतनीकरण देखील प्रलंबित आहेत. या सर्व बाबी लक्षात घेतात आपल्या कडून संबंधित सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे सर्व अध्यक्ष तसेच बांधकाम कामगार संघटना यांच्या समवेत एकत्रित बैठक होऊन सर्व अडचणींवर चर्चा होऊन समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात यावे अशी मागणी केली. गरज पडल्यास पूर्ण जिल्ह्यातून कामगार एकत्र येऊन आपल्या मार्गदर्शनात उपोषण करण्यास देखील तयार आहेत आपण या विषयात लक्ष घालून जिल्हयातील कामगाराच्या समस्याचे निवारण करावे अशी मागणी केली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!