शासनाने मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी

कणकवली तालुका मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

लाठी हल्ल्याचा केला निषेध

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हयातील अंतरवाली सराठे येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली शांततेच्या मार्गाने संविधानिक पध्दतीने आमरण उपोषण सुरू होते. राज्य सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी अंबड व गेवराई तालुक्यातील 123 गावांतील स्त्री पुरूष शेतकरी 1 सप्टेंबर रोजी उपोषण स्थळी जमले होते. यावेळी शासनाकडून शेकडोंचा पोलीस फौजफाटा जमा केला गेला. मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून निष्पाप आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला गेला. यामध्ये पुरूष वर्गाबरोबर मोठया प्रमाणात महिला वर्ग आणि मुले यांनाही पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. आयाबहिणीवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा आम्ही सकल मराठा समाजातर्फे जाहिर निषेध करतो. असे निवेदन कणकवली तालुका मराठा समाज बांधवांतर्फे कणकवली तहसीलदारांना देण्यात आले आहे. आतापर्यंत जगाच्या इतिहासात शांततेने लाखोंच्या संख्येने मराठा समाजाकडून 58 मोर्चे काढले गेलेत. तरीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत शासन ठोस पावले उचलत नसल्याने उपोषणासारख्या उपायांचा मार्ग अवलंबवावा लागला. या शासनाला मराठा समाजाबद्दल आस्था असल्यास मराठा समाजाच्या पुढील मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात म्हणून हे निवेदन आपल्याकडे सादर करत आहोत.
1) सप्टेंबर, 2023 रोजी सनदशीर मार्गाने आंदोलन असलेल्या मराठा समाजातील बंधू भगीनींवर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या संबधित पोलीस अधिक्षक श्री. तुषार जोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याऐवजी निलंबित करण्यात यावे. या प्रकरणामागे अन्य सूत्रधार असल्यास त्यांचीही चौकशी करून त्यांचे नाव जाहिर करण्यात यावे.मराठा समाजातील तरूणांच्या भवितव्याचा विचार करता तात्काळ संविधानिक आरक्षण मराठा देण्यात यावे.
3) सकल मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असताना शासनाने मराठवाडयात कुणबी मराठा समाजाची वंशावळी तपासणी कामाचे आदेश दिले आहेत याचा अर्थ शासन मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.
4) त्याचबरोबर राज्य शासनाने संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आपली निश्चित भूमिका काय? ती त्वरीत स्पष्ट करावी.
5) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करून समाजाचा वापर करण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर तो मराठा समाज कदापि सहन करणार नाही.
सदर निवेदनाद्वारे मराठा समाजातील जनतेच्या संतप्त भावना आपल्या मार्फत शासनापर्यंत पोहचविण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे मराठा समाज बांधवांतर्फे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सखाराम सपकाळ, भाई परब, महेश सावंत, सुशील सावंत, रूपा सांडव, मयुरी पाटील, नीलिमा भोगले आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!