पत्रकारितेतील नवीन बदल अंगिकारले पाहिजेत – के. मंजुलक्ष्मी

कुडाळ तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा
चंद्रशेखर तांबट, राजन नाईक, भूषण देसाई पुरस्काराचे मानकरी
पत्रकार आणि त्यांच्या पल्ल्यांचाही गौरव
प्रतिनिधी । कुडाळ : पत्रकारितेमध्ये होणारे बदल हे प्रत्येक पत्रकारांनी अंगीकारले पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी करून आमच्या होणाऱ्या चुका आणि आमच्या कामाचे कौतुक हे पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाते . ज्या चुका होतात त्या सुधारण्याची संधी सुद्धा पत्रकारांमुळे मिळते. असेही त्या म्हणाल्या. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसीलदार अमोल पाठक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उद्योजक बापू नाईक नगराध्यक्ष आफ्रिन करोल उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, ओरोस मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, माजी अध्यक्ष संजय पडते अमरसेन सावंत, अतुल बंगे, दादा साईल, देवेंद्र सामंत, राजन नाईक, रुपेश पावसकर, प्रसाद गावडे, राजू गवंडे, जयराम डीगसकर, राजेश टगसाळी राकेश कांदे आदी उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ग म तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर तांबट (कणकवली) कै वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार भूषण देसाई (परूळे), छायाचित्रकार पुरस्कार राजन नाईक (कुडाळ) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच पत्रकार क्षेत्रात काम करत असताना इतर क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणा-या पत्रकारांचे सत्कार यावेळी करण्यात आले यामध्ये गुरु दळवी, राजन नाईक, वैशाली खानोलकर, निलेश तेंडोलकर, दीपक तारी, अजित परब याना गौरविण्यात आले. तर विद्यार्थ्यांमध्ये कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, अनुष्का सावंत, आस्था मर्गज, आर्या मर्गज, अथर्व मर्गज या गुणवंताचा समावेश होता., त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले की, पत्रकारिता हे काम वाटतं तेवढे सोपे नाही. आपली भूमिका तटस्थपणे मांडणे हे सर्वात महत्त्वाचे असते. पत्रकारितेमध्ये अनेक बदल होत आहेत. आता पत्रकारिता सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रबळ झाली आहे. आपली मते मांडण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम झाले असले तरी प्रिंट मीडियाची पत्रकारिता ही विश्वासार्ह मानली जाते. पण पत्रकारितेत होणारे बदल हे पत्रकारांनी अंगीकारले पाहिजे, पत्रकार प्रशासनाकडून होणाऱ्या चुका दाखवतात. त्यामध्ये सुधारणा करण्याची आम्हाला संधी मिळते. कोविडच्या काळामध्ये आम्हाला पत्रकारांनी चांगली साथ दिली त्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम करू शकलो. चांगल्या कामाचे कौतुक पत्रकार करतात असेही त्यांनी सांगितले. .
यावेळी माहीती अधिकारी प्रशांत सातपुते पत्रकारीतेला विशिष्ट असा कोणताही अभ्यासक्रम नाही, पत्रकाराला सर्वच विषयाचे ज्ञान असावे लागते. पत्रकार लेखणी रूपाने शब्द सिंचनाने संस्कृतीचा, समाज सुधारण्याचे काम करीत असतो. पत्रकाराच्या लेखणीमुळे शांती व क्रांती होते. व ही क्रांती व शांती केव्हा करायची आहे हे पत्रकारांवर अवलंबून असते. पत्रकार परिषदा कमी होत आहेत. येणारा भविष्यकाळ आपल्याला आज सांगून जातोय की पुढे काय होणार आहे. सध्या जगात ऑनलाईन सुरू आहे. तरीही पुस्तक व वाचनाशिवाय पर्याय नाही. समाजाच्या संस्कृतीचे मस्तक म्हणजे पुस्तक आहे. असे त्यांनी सांगितले. रणजित देसाई यांनी पत्रकारितेचे बाळकडू आम्हाला आजोबा भय्यासाहेब वालावलकर यांच्या माध्यमातून घरातच मिळाले त्यांच्या काळातील पत्रकारितेचा उलगडा केला. बापू नाईक, मोहन होडावडेकर, आफ्रिन करोल, उमेश तोरस्कर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेशवंदनाने झाली. ओंकार सावंत या सहा वर्षीय मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राज आलं या गीतावर नृत्याविष्कार केला. कार्यक्रमाचे निवेदन बंड्या जोशी यांनी केले प्रास्ताविक विजय पालकर तर आभार अजय सावंत यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.