खरेदी विक्री संघ चालु हंगामात सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार

खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांची माहिती

कणकवली खरेदी विक्री संघ चेअरमन गट सचिव सभा

विकास संस्थांनी लायसन्स नुतनीकरण करुन घ्यावे

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ शेतक-यांना न्याय देण्याच्या दृष्टीने नेहमीच काम करत आहे. त्यामुळे चालु खरीप हंगामात शेतक-यांना आवश्यक असलेली खते आणि लागणारी बियाणे वेळेत देण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन आहे. ज्या पध्दतीने कृषी अधिक्षक आणि संबंधीत खत कंपनीच्या अधिका-यांनी विकास संस्थांना ज्या सुचना केल्या आहेत, त्याचे पालन करावे. विकास संस्थांनी खत विक्री व्यवसाय लायसन्स नुतनीकरण करुन घ्यावे. खरेदी विक्री संघ चालु हंगामात सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा केला जाईल , असे प्रतिपादन विठ्ठल देसाई यांनी केले.

वागदे येथे कणकवली खरेदी विक्री संघ चेअरमन गट सचिव सभेत ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर बॅक संचालक विठ्ठल देसाई , खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत , व्हाईस चेअरमन सुरेश ढवळ , खारेपाटन सोसायटी चेअरमन बाळा जठार , शिवडाव चेअरमन किरण गांवकर , संचालक पंढरी वायंगणकर , अतुल दळवी , विनिता बुचडे , सौ. परब , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी शेणवे , आरसीएफ विभागीय व्यवस्थापक श्रीकृष्ण वराडकर , महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक श्री. काळे आदींसह तालुक्यातील विकास संस्था चेअरमन गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेअरमन प्रकाश सावंत म्हणाले, केंद्र शासनाचे खता संदर्भात धोरणानुसार विकास संस्थांनी खत विक्री लायसन्स नुतनीकरण केले पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आवश्यक ते बदल स्विकारले पाहिजे. आपण सर्वजण शेतक-यांसाठी काम करत आहोत. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर खत देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यासाठी ही बैठक आम्ही आयोजित केली त्याला आपला चांगला प्रतिसाद लाभला.

प्रभारी कृषी अधिक्षक श्री. संभाजी शेणवे म्हणाले , विकास संस्था आणि खाजगी उद्योजकांनी आपली लायसने वेळेत रजिस्ट्रेशन करुन घ्यावी. आपले सरकार केंद्रावर जाऊन याबाबत डीबीडी पोर्टलवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत. या हंगामात खत विक्री करताना ऑनलाईन स्टॉक पाहूनच खत पुरवठा केला जाणार आहे. त्याची सर्व संस्थांनी नोंद घ्यावी. खत पुरवठा सुरळीत होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील.

आरसीएफ विभागीय व्यवस्थापक श्रीकृष्ण वराडकर म्हणाले , शासनाच्या धोरणानुसार खत पुरवठा केला जातो. आमच्या कंपनी मार्फत 15 एप्रिल पर्यंत पहिली रेघ लागेल त्या दृष्टीने विकास संस्थांनी पॉज मशीन आणि लायसन अपडेट करुन ठेवावे. खत विक्री झालेल्याची नोंद पॉ़ज मशीन मध्ये न झाल्यास त्याचा स्टॉक ऑनलाईनला दिसतो त्यामुळे , खत पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्याच बरोबर शासनाकडून मिळालेले अनुदान देखील कंपनीला मिळत नाही.

महाराष्ट्र कृषी महामंडळाचे व्यवस्थापक श्री. काळे म्हणाले, आमच्याकडे कृषी उद्योग खत पुरवठा करण्यासाठी स्टॉक उपलब्ध आहे. आपल्याकडून मागणी आल्यानंतर तातडीने खत पुरवठा करण्यात येईल .

या सभेत असलदे सोसायटी चेअरमन श्री. भगवान लोके , नाटळ सोसायटी चेअरमन श्री. नंदकिशोर सावंत , फोंडाघाट सोसायटी चेअरमन श्री. राजन नानचे आदींसह तालुक्यातील विकास संस्था चेअरमन यांनी या सभेत संस्थांच्या अडचणी बाबत व खत मागणी संदर्भात चर्चेत सहभाग घेतला. या सभेचे प्रास्ताविक व्यवस्थापक गणेश तावडे तर आभार व्हाईस चेअरमन सुरेश ढवळ यांनी मानले.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!