फणसगाव होळी उत्सवात पारंपरिक प्रथांचा होतोय जागर

होळी उत्सवामुळे फणसगाव मध्ये चाकरमान्यांची वर्दळ वाढली आहे.घरोघरी भेट देणारया पालखी अबदागिरी निशाण मुळे या भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
फणसगावच्या शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला देव होळी आणि गाव होळी घालून होते. धुलीवंदनाच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरात पालखी, मानाचे खांब, अबदागिरी, व निशाण सजवून कापड खेळे शिमग्याचा खेळ खेळत शिमग्याचा जत गायला जातो. त्यानंतर श्री देव महादेव व महालक्ष्मी मंदिरात येऊन पारंपरिक पद्धतीने अन्य देव- दैवतांना निमंत्रित करून पालखी व संपूर्ण देवाचा साज ढोल ताशांच्या गजरात चव्हाट्यावर आणला जातो. चव्हाट्यावर पालखी नाचवली जाते व त्यानंतर गाव होळीच्या समोर जत बोलून गावीक गाऱ्हाण सांगितले जाते. त्यानंतर भाविक भक्तांची गाऱ्हाणी सांगितली जातात. नवीन नवस बोलणे व बोललेले नवस फेडले जातात. यावेळी मुंबईकर चाकरमानी मंडळी ही मोठया प्रमाणात उपस्थित असतात.
दुसऱ्या दिवशी ढोल- ताशा वाजवत पालखी, अबदागिरी व निशाण पाटील वसाच्या मूळ पुरुषाच्या घरी नेली जाते. त्यानंतर देव आपल्या भक्तांच्या भेटीला भक्तांच्या घरी जातात. फणसगाव व विठ्ठलादेवी गाव जरी महसुली दृष्ट्या वेगळे असले तरी गावऱ्हाटी एकच आहे. १८ वाड्यांचा गाव असून अनुक्रमे एक- एक वाडीत घरोघरी पालखी भक्तांना दर्शन देण्यासाठी जाते. घरी आलेल्या पालखीचे स्वागत करून पालखी , अबदागिरी व निषाणाची विधिवत पूजा करून घरी आलेल्या खेळयांना लाडू, पेढ्याचा प्रसाद वाटला जातो. यावेळी घरी आलेल्या देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशीणी ही मोट्या प्रमाणात माहेरी येत असतात. घरी आलेल्या खेळयांना शिमग्याचे पोस ( पैसे) वाटण्याची प्रथा आहे. पाटील , नागप, आडिवरेकर, नारकर, पेंडूरकर हे पाच मानकरी असून घाडी व गुरव हे देव पुजारी असून देवाची दररोज नित्यनेमाने पूजा करतात.
सुमारे १५ दिवसांच्या चालणाऱ्या शिमग्याची सांगता अमावस्येपूर्वी देवाला शिंपण घालून होते.

error: Content is protected !!