खावटी कर्जमाफीबाबत आ. वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उठविला आवाज

खावटी कर्जमाफीचा विचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांच्या खावटी कर्जांची कर्जमाफी अद्याप पर्यंत झालेली नाही. शिंदे भाजप सरकराने सुरुवातीला खावटी कर्ज माफी करण्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबत अंबाबाजवणी झाली नाही त्यामुळे आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात कर्जमाफी प्रश्नावर लक्षवेधी सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्जांच्या कर्जमाफीची मागणी केली. त्यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी खावटी कर्जमाफीबाबत सकारात्मकता दर्शविली.
कोकणात सातबारा वर कुटुंबातील अनेक व्यक्तींची नावे असतात त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना अडचणी येतात, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांनी जिल्हा बँके मार्फत खावटी कर्ज योजना राबविली होती. शेतकरी हंगामावेळी जून जुलै महिन्यात खावटी कर्ज देऊन व मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांकडून कर्ज भरणा केले जात होते. महाविकास आघाडी सरकराने राज्यात कर्जमाफी योजना राबिविली त्यावेळी खावटी कर्ज माफीचा समावेश केला होता.त्यावेळी खावटी कर्जांचा सर्व्हे करण्यात आला. ऑडिट करण्यात आले. परंतु दुर्दैवाने सरकार पडल्याने खावटी कर्ज माफी झाली नाही. आताच्या शिंदे भाजप सरकराने खावटी कर्जमाफी जाहीर केली मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. कर्जमाफी होणार म्हणून संबंधित शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम थकीत आहे. त्यावर व्याज वाढत आहे.कर्जमाफी न झाल्याने शेतकरी व शेतीकर्ज देणाऱ्या संस्था,विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. त्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश होणे गरजेचे आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात आवाज उठवीत खावटी कर्ज माफी करण्याची मागणी केली. त्यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी खावटी कर्जमाफीचा नक्कीच विचार केला जाणार असल्याचे आ. वैभव नाईक व सभागृहास आश्वासित केले.
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी