कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर

अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड

बैठकीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील उपस्थित वीज ग्राहकांनी विजेच्या समस्यांबाबत महावितरणचे वेधले लक्ष

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ग्राहकांच्या विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची कुडाळ तालुका बैठक मंगळवारी येथील अनंत मुक्ताई हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील उपस्थित वीज ग्राहकांनी विजेच्या समस्यांबाबत महावितरणच्या अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले. यावेळी कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर करून या संघटनेच्या अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड करण्यात आली. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी आफरीन करोल, सचिवपदी किरण शिंदे, कार्यकारिणी सदस्य महादेव जुवेकर, साईनाथ आंबेरकर, नयना मांजरेकर, शिवराम आरोलकर, अर्जुन आमडोसकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीला वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय मिसाळ, कार्यकारी अभियंता ए. जे. दिनोरे, आर. के. पाटील, सहाय्यक अभियंता छाया परब, वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक किरण शिंदे, श्रीनिवास गावडे, संजय गावडे, प्रसाद शिरसाट, अवधूत शिरसाट, गोविंद सावंत, नितीश म्हाडेश्वर, संजय लाड, चंदू शेडगे, रवीभूषण खोचरे, समाधान परब, संजय गावडे, भूषण मठकर, तृप्ती तोरसकर आदींसह तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या गणेशोत्सवात कुडाळ तालुक्यात महावितरणकडून होणारे नियोजन, कुडाळ शहर आणि ग्रामीण भागातील वीज खांब आणि लाईन जीर्ण झालेल्या धोकादायक वीजवाहिन्या, वाढीव बिले, नवीन कनेक्शनबाबत महावितरणकडून होणारा विलंब, तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष, ग्रामीण भागात होणारा खंडित वीजपुरवठा अशा अनेक तक्रारी उपस्थित वीज ग्राहकांनी या बैठकीत मांडल्या. या समस्या महावितरणने दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी शहरासह ग्रामीण भागातील सर्व वीज समस्या तातडीने दूर करून ग्राहकांना अखंडित सेवा द्यावी. गणेशोत्सव काळात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची वीज वितरण विभागाने दक्षता घ्यावी. सणासुदीच्या काळात वी पुरवठा खंडित झाल्यास, वीज ग्राहक संघटना वीज वितरण विभागाला घेराव घालून जाब विचारेल, असा इशारा दिला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!