रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण स्वागतार्ह्य पण कोकणवासीयांच्या यातना कधी संपणार ?

राज्यकर्त्यांना चाकरमान्यांच्या व्यथा दिसत नाहीत हे दुर्दैव..!
प्रसाद गावडे यांनी उपस्थित केले प्रश्न
प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वेची निर्मिती करताना महाराष्ट्राने 70 %,गोव्याने 10 % आणि कर्नाटक ने 20% आर्थिक टक्के वाटा उचलला मात्र तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वाट्याला गाड्यांच्या फेऱ्या आल्या नाहीत. दादर रत्नागिरी व तुतारी एक्सप्रेस वगळता आपल्याला फक्त वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या आहेत.दुसरीकडे गोव्याच्या वाट्याला दहा गाड्या,कर्नाटकच्या वाट्याला वीस गाड्या आणि विषेश बाब म्हणजे कोणताही आर्थिक भार न उचलणाऱ्या केरळ आणि तामिळनाडूच्या वाट्याला प्रत्येकी दहा गाड्या दिलेल्या आहेत. मग रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बदल्यात दिले ते काय? आज चाकरमान्यांना तिकिटे उपलब्ध होत नाहीत,मागील पंचवीस वर्षात ट्रॅकचे दुपदरीकरण झाले नाही,दलालांनी तिकिटांचा काळा बाजार मांडून देखील त्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही, सणासुदीला गावी परतताना चाकरमान्यांना अक्षरशः मरण यातना भोगाव्या लागतात अशी सर्व भयंकर परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहून राज्यकर्ते जनतेची मजा घेत आहेत का असा सवाल मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींनी या परिस्थितिकडे गांभीर्याने पाहून एकजूट दाखवण्याची गरज आहे. कोकण रेल्वेकडून भूमीपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत जनतेच्या भावना तीव्र असून सुशोभिकरणाच्या नावाखाली ठेकेदारांना पोसण्याला प्राधान्य देण्यापेक्षा सोयी- सुविधा व वर्षभर हक्काची तिकिटे प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी खरी जनतेची भावना असल्याचे स्पष्ट करत मनसेने चाकरमान्यांच्या समस्यांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.