दोडामार्ग आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा

विवेकानंद नाईक : दोडामार्गमध्ये पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात प्रतिपादन

प्रतिनिधी l दोडामार्ग
दोडामार्ग आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा, अशी अपेक्षा
श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, दोडामार्गचे अध्यक्ष, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी येथे व्यक्त केली.
गरीब कुटुंबात जन्माला येणे आपल्या हातात नसते;पण जन्मल्यानंतर गरिबीतून बाहेर पडणे आपल्या हातात असते.त्यासाठी शिकण्याच्या सात आठ वर्षात खूप मेहनत करायला हवी, मग पुढचा सगळा काळ सुखाचा येतो असे सांगून विवेकानंद नाईक म्हणाले,दोडामार्ग तालुका येत्या ७ ते ८ वर्षात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, मी तन, मन, धनाने लागेल ती मदत करीन अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
येथील सुशीला हाॅलमध्ये दोडामार्ग तालुका पत्रकार समिती व श्रीमती सुशीलाबाई मेमोरियल ट्रस्ट,दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर ,तहसीलदार अरुण खानोलकर, पोलिस निरीक्षक अरुण पवार, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, युवा उद्योजक बाबा टोपले, शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख संजय गवस, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष ॲड. सोनू गवस, राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा सरचिटणीस संदीप गवस, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लखू खरवत, माजी अध्यक्ष प्रभाकर धुरी व सुहास देसाई आदी उपस्थित होते.
श्री . तोरसकर म्हणाले,पत्रकार, राजकारणी आणि समाजातील इतर घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाजाची प्रगती नक्की होते.ते म्हणाले,पत्रकारांना पत्रकारांच्या समितीकडून सन्मान मिळायलाच हवा.आपल्या माणसांचा आपण सन्मान केल्याने प्रेरणा मिळते. पत्रकार आणि पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .आपल्या जिल्ह्यातील पत्रकार नेहमी आपल्या लेखणीतून समाजाला योग्य दिशा आणि पीडित घटकांना न्याय देण्याचे काम करतात.त्यांचा सन्मान व्हायलाच हवा असे सांगून ते म्हणाले, समाजातील अनेकांकडे खूप काही असते; पण सर्वांकडे दातृत्वाची भावना नसते . उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक एक चांगले दातृत्ववान व्यक्तिमत्व आहे.श्री. नाईक यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! त्यांनी प्रत्येक वर्षी दोन विद्यार्थी दत्तक घेवून त्यांना आयएएस व आयपीएस बनविण्याचे स्वप्न बाळगले आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची गरज आहे तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे समजून समाजासाठीही काम करायला हवे असेही श्री. तोरस्कर म्हणाले.
यावेळी सन २०२०-२१ चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सुनील नांगरे यांना,उदयोन्मुख पत्रकारिता पुरस्कार ओम देसाई यांना, सन २०२१-२२ या वर्षाचा तालुका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तेजस देसाई यांना तर उदयोन्मुख पत्रकारिता पुरस्कार गजानन बोंद्रे यांना देण्यात आला.सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाला तालुक्यातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचे प्रतिनिधी आणि पालक उपस्थित होते.

शिक्षणावर लक्ष केंद्रित करा

पोलिस निरीक्षक अरुण पवार म्हणाले , विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अन्य कोणत्याही गोष्टींऐवजी शिक्षणावरच केंद्रित करावे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात उच्च पदावर जायचे आहे त्यानुसार आपले ध्येय निश्चित करावे आणि शिक्षण घेत असताना अनावश्यक गोष्टीपासून दूर राहावे.

error: Content is protected !!