कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमदार राणेंकडुन कानपिचक्या!

काही अधिकाऱ्यांची भावना खिशातले पैसे दिल्यासारखी
शासन आपल्या दारी व तालुका कृषी महोत्सवाचे आमदार राणेंच्या हस्ते उद्घाटन
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर व राणे कुटुंबीयांवर विश्वास टाकला त्यामुळेच आम्ही विधानभवन किंवा मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचू शकलो. आम्हाला जो आज समाजात मानसन्मान मिळतो याचे श्रेय या मतदारसंघातील जनतेला आहे. त्यामुळे जनतेपेक्षा माझ्यासाठी मोठं कोणी नाही. असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. कणकवली भगवती हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी व कणकवली तालुका कृषी विभागाच्या तालुका कृषी महोत्सवाच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी श्री राणे बोलत होते. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर जे पवार, बिडीओ अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधुत तावडे, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रणिती इंगवले, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील,कृषी अधिकारी सुभाष पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील अनेक विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात आमदार श्री. राणेंच्या हस्ते प्रमाणपत्र व योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. तर कृषी विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या स्टॉलला भेटी देत आमदार राणेंनी पाहणी करून त्यांच्याबद्दल कौतुक उद्गार काढले. यावेळी बोलताना आमदार राणे यांनी काही अधिकारी कर्मचारी हे स्वतःच्या खिशातले पैसे जनतेला योजनांसाठी देतात असे वागतात. मात्र त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मग आमचा फोन गेल्यानंतर कामे होतात. अशी वेळ येऊ देऊ नका. आज या अभियानाच्या निमित्ताने जास्त वेळ न घेता दिवसभरात लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ द्या असे सांगत आमदार राणे यांनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने कानपिचक्या देखील दिल्या. तर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्यात महसूल मंत्री असताना 2005 मध्ये ही योजना राबवली होती. त्यावेळी देखील या योजनेचा लाभ अनेक लोकांना मिळत होता. अनेक ठिकाणी योजना राबवण्यासाठी लोक वेटिंग वर असायचे असे सांगत त्यावेळी त्या आठवणींना उजाळा देखील दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले तर सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले.
दिगंबर वालावलकर /कणकवली