विजय चव्हाण यांची सेन्सॉर बोर्डावर निवड

निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी सिने नाट्य कलाकार व कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात विविध लोककला आहेत नाट्य, तमाशा, इतर जे काही घडते हे सेन्सॉर होणे आवश्यक आहे. यासाठी सेन्सॉर बोर्ड हे अत्यंत संवेदनशील असते आणि अशा या महत्त्वाच्या पदावर, गेली 40 वर्षे श्री चव्हाण यांनी रंगभूमीसह विविध क्षेत्रातील दिलेले योगदान याचा विचार करून राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांची केलेली निवड सिधुदुर्गसाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे. जिल्ह्यात विविध नाट्यसंस्था विविध रंगकर्मी आहेत. सांस्कृतिक रंगभूमीसह श्री चव्हाण हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्याला सर्व क्षेत्रात कोंकण राज्य पातळीवर अव्वल ठेवले आहे. खरोखरच या अष्टपैलू व्यक्तीची निवड जिल्ह्यासाठी शान आहे.
सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहिता पूर्व परिक्षण पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (५) (Wa) (1) नुसार तमाशा मेळा व रास इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या संहिताचे पूर्व परिक्षण करून, सदर कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र (Sutability Cert) देण्यासाठी गृहविभागाच्या दि.०५.०१.१९५४ च्या अधिसूचनेद्वारे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण स्थापना करण्यात आली आहे. मंडळाकडे प्राप्त संहितांचे पूर्व परिक्षण रंगभूमी मंडळातील साहित्य कला क्षेत्रातील अनुभवी / तज्ञ मान्यवरांकडून केल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. संपूर्ण कार्यवाही सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा (सिनेमाव्यतिरिक्त) आणि मेळे व तमाशे सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी ही निवड करण्यात आली आहे.
विजय चव्हाण यांनी अक्षरसिंधु साहित्य कला मंच सिंधुदुर्ग या संस्थेची १९९३ ला स्थापना करुन गेली ३० वर्ष महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इत्यादि राज्यामध्ये सर्व नाटय स्पर्धेमध्ये सतत सहभाग घेऊन २५ पेक्षा जास्त नाटक सादर केलेली आहेत व त्याचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग केलेले आहेत. गेली ३० वर्षे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इत्यादि राज्यामध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये सतत सहभाग घेऊन ३५ पेक्षा जास्त एकांकिका सादर केलेल्या असून १००० पेक्षा जास्त प्रयोग सादर केलेले आहेत. नाटयलेखनमध्ये गावय, शबय भाविण, येरे येरे पावसा, झंपय ही नाटके स्वतः लिहीलेली आहेत. सदर नाटके महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाटय स्पर्धेत महाराष्ट्र शासन कामगार कल्याणच्या राज्य नाटय स्पर्धेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या राज्य नाटय स्पर्धेत सादर करुन सांघिक, दिग्दर्शन, लेखन, पुरष अभिनय, स्त्री अभिनय, नेपथ्य, संगीत अशी सगळया नाटयांगाची पारितोषिके मिळाली आहेत.
ऑपरेशन दगड, म्युनसीपालटीकरन, गावय, वंदे मातरम, उषकाल, आता फक्त बाजीराव, सल, जाणतो, अखेर इत्यादि नाटक व एकांकिकांचे दिग्दर्शन केले असून अनेक दिग्दर्शनाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.ऑपरेशन दगड, म्युनसीपालटीकरन, गावय, शबय भाविण, येरे येरे पावसा, उषकाल आता फक्त बाजीराव, सल, राजदंड, एक कप चहासाठी इत्यादि नाटक व एकांकिकांमध्ये कलाकार म्हणून काम केलेले असून अनेक राज्यस्तरीय अभिनयाची पुरस्कार मिळालेले आहेत. गावय, शबय भाविण, येरे येरे पावसा, आता फक्त बाजीराव, सल इत्यादि नाटकांना नेपथ्य व संगित केले असून यानांही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. संगित नाटक – थीएटर अॅकॅडमीक पुणे आयोजित राज्यस्तरीय संगित एकांकिका स्पर्धेमध्ये दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो, तेलाचे गाणे, म्युनसीपालटीकरण, ऑपरेशन दगड या संगित एकांकिका सादर केल्या असून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या संगित नाटयस्पर्धेत तेलाचे गाणे हे संगीत नाटक सादर केले असून त्यामध्ये अभिनय केलेला आहे.
लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्यानी लोककला व लोकसंगीताचे महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, दिल्ली मध्ये 500 पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. यामध्ये दशावतार कळसूत्री बाहुल्या, फुगड्या, भजन, कीर्तन, भारुड, लळीत, धनगर नृत्य, चपई नृत्य, बाल्यानृत्य, कापडखेळे, पांगुळ बैल, ठाकर लोककला, आदींचा समावेश आहे. त्यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.