दु:खीत पीडितांच्या वेदनांचे लेखन व परधर्म सन्मान ही बाबासाहेबांची शिकवण- उर्मिला पवार

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधू वैभव साहित्य समूहाच्या ‘आपले बाबा-2022’ पुरस्काराचे प्रदान
डॉ श्रीकांत धारपवार व डॉ मिलिंद शेजवळ- हिरामणराव शेजवळ याना पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ व साहित्यिक डॉ रवींद्र शिवदे यांची उपस्थिती
तुमची लेखणी तुमचे स्वतःचे दुःख लिहिण्यासाठी वापरू नका. गरीब पीडित व दलितांच्या वेदना लिहा असे बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांना सांगत. या कसोटीवर डॉ श्रीकांत धारपवार व डॉ मिलिंद शेजवळ- हिरामणराव शेजवळ यांचे लेखन उतरले आहे. असे प्रतिपादन सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधूवैभव साहित्य समूह कणकवलीच्या ‘आपले बाबा-2022’ पुरस्काराचे प्रदान करताना ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी केले. हा पुरस्कार आंबेडकरी साहित्याला देण्यात येतो. रोख रक्कम व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार 20 मार्च 2023 या महाड चवदार तळे पाणी सत्याग्रहाच्या दिवशी ऑनलाइन प्रदान करण्यात आला. महाड सत्याग्रह मूलभूत गरजेसाठी होता. या सत्याग्रहातील माता रमाबाई, त्यांच्या जाउबाई व इतर स्त्रिया यांच्या योगदानाचा उल्लेख उर्मिला पवार यांनी केला.
नवबुद्ध धर्मियांनी हिंदू धर्मातून बाहेर पडताना हिंदू देवतांच्या मूर्ती सन्मानाने पाण्यात विसर्जित केल्या, त्या त्याऐवजी रागाने कचऱ्यात का फेकल्या नाहीत, अशा आशयाचा प्रश्न मला परदेशात केला गेला , तेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला जो धर्म आवडत नाही , त्याचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी इतर धर्मांचा सन्मान करायची शिकवण सुद्धा त्यांनी दिली, असे त्या पुढे म्हणाल्या.
आज दलित साहित्य जागतिक पातळीवर गाजत असले तरी दलित साहित्याची सुरुवातीला रडगाणे म्हणून काही लोक हेटाळणी करायचे. त्यावेळी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनी हिरीरीने सत्य परिस्थिती मांडली होती. परदेशात दलित साहित्य आणि धर्मांतर याबद्दल अनेक प्रश्न औत्सुक्याने विचारले जातात. असे त्या म्हणाल्या. अशिक्षित, उपाशीपोटी लोकांना आपले जीवन बदलून टाकायची जिद्द बाबासाहेबांनी कशी दिली, याचे कौतुक व विचारणा नेहमी जागतिक पातळीवर होत असते. असे त्यांनी सांगितले.
आज बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, स्त्रीवर होणारे अत्याचार वाचून संवेदनशील मनाला खूपच वेदना होतात असे त्या शेवटी म्हणाल्या.
पुरस्कार स्वीकारताना ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या पुस्तकाचे लेखक डॉ श्रीकांत धारपवार यांनी ‘करोना काळात मिळालेल्या फूरसतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीत बाबासाहेबांच्या प्रेरणेने घडलेल्या घडामोडींचे लिखाण मी करू शकलो’ असे प्रतिपादन केले. 1922 च्या मालवण दलित परिषदच्या लक्ष्मण सगुण चव्हाण, गोविंद येसू मालवणकर इत्यादी दलित नेत्यांपासूनचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या कामाचा आढावा या पुस्तकात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मंदिर प्रवेशासाठी शुभांगी पवार व डॉ सतीश पवार यांना संघर्ष करावा लागतो, हे खेदजनक आहे. तसेच अनुसूचित जातींमध्ये पहिल्या सारखी एकजूट निर्माण व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
‘आंबेडकरी जलसा’ या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ मिलिंद शेजवळ यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेल्या सकारात्मक बदलाचा उल्लेख केला. दलित साहित्य हे खरेखुरे घडलेले असते, हे काल्पनिक लिखाण नाही. तरीही त्याला राजदरबारात मान मिळत नाही ही खंत जाहीर केली. आंबेडकरी जलसा या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे चित्रण असून नाशिक जिल्ह्यात बाबासाहेबांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता.
डॉ श्रीकांत धारपवार व डॉ मिलिंद शेजवळ हे 1974 चे केईम हॉस्पिटल , मुंबईचे एम बी बी एस चे विद्यार्थी असून उर्मिला पवार या प्रसिद्ध पुस्तक ‘आयदान’ च्या लेखिका व स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत. आयदान हे पुस्तक भारतातील अनेक व अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. डॉ धारपवार यांनी अकरा नाटके व डॉ मिलिंद शेजवळ यांनी 48 पुस्तके लिहिली आहेत.
कार्यक्रमाला ज्येष्ठ भाषा अभ्यासक व तज्ज्ञ, साहित्यिक डॉ रविंद्र शिवदे, नाशिक व सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी पवार हे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ सतीश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सिंधुवैभव साहित्य समूहाच्या अध्यक्षा स्नेहा राणे सरंगले यांनी केले.
कणकवली / सितराज परब / ब्यूरो न्यूज