महावितरणच्या बिल प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा

मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण केवळ दीड टक्के

ब्युरो । मुंबई : वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असून गेल्या सहा महिन्यात विजेच्या मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाले असून जानेवारी महिन्यात ते दीड टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. परिणामी, ग्राहकांच्या वीजबिलांविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
महावितरणच्या ग्राहकांच्या वीज मीटरचे फोटो काढले जातात व त्यांच्या आधारे वीजवापराच्या आकडेवारीची नोंद केली जाते. त्यानुसार ग्राहकांना विजेची बिले दिली जातात. मीटर सदोष असेल किंवा बंद असेल, घराला कुलुप असल्याने मीटर रिडिंग करता येत नसेल, मीटरचे पॅनेल स्पष्ट दिसत नसेल किंवा मीटरचा फोटो अस्पष्ट असेल तर सरासरी वीजबिले दिली जातात.
मीटरचे फोटो स्पष्ट असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराइतकी अचूक बिले दिली जातात. त्यामुळे त्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच महावितरणच्या महसुलातही वाढ होते.
मीटरचे फोटो स्पष्ट असावेत व वीजवापराचे आकडे अचूक नोंदविले जावेत यासाठी कंपनीने मोहीम राबवली. त्यामुळे एके काळी ४६ टक्क्यांवर असलेले मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण खूप कमी झाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण २.३ टक्के होते. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे प्रमाण आणखी कमी होऊन जानेवारी महिन्यात केवळ दीड टक्का इतके झाले.
राज्यात सामान्य वीजबिलांचे प्रमाण ८९.८ टक्के इतके जास्त झाले आहे. हे प्रमाण कल्याण परिमंडळात सर्वाधिक म्हणजे ९६.४ टक्के इतके झाले आहे. नागपूर (९५.५ टक्के), कोल्हापूर (९५.५ टक्के) व भांडूप (९५.२ टक्के) या परिमंडलानी सामान्य बिलांच्या बाबतीत ९५ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले आहे. पुणे (९४.५ टक्के) व गोंदिया (९५.७ टक्के) या परिमंडलांना सामान्य बिलांचे प्रमाण ९४ टक्क्यांच्या वर राखण्यात यश आले आहे.
मीटरच्या अस्पष्ट फोटोंच्या बाबतीतही या परिमंडलांची कामगिरी चांगली आहे. कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, कोकण, कल्याण व भांडूप या परिमंडलात वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण प्रत्येकी एक टक्क्यांच्याही खाली गेले आहे. पुणे, बारामती, अमरावती, जळगाव व नांदेड या परिमंडलांमध्ये वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाणे एक ते दोन टक्के आहे. मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण कमी करण्यात विविध परिमंडलांची कामगिरी वेगवेगळी आहे. राज्यातील हे एकूण प्रमाण जानेवारी महिन्यात दीड टक्के होते.
वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत व त्यांच्या बिलांच्या बाबतीत काही तक्रार राहू नये यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे. वीज ग्राहकांनीही वेळेवर व नियमितपणे बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.

error: Content is protected !!