सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या नियुक्त्या सुरू
पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे भाई चव्हाण
कणकवली:- शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांसाठी सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्त्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ जुलैला मालवण तालुक्यातील ५ शाळांमध्ये ५ सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश दिले आहेत. या सेवानिवृत्त शिक्षकांना गेल्या काही वर्षांमध्ये बदललेल्या नविन शैक्षणिक धोरणाबाबत प्रशिक्षण नाही. त्यामुळे अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तरी पालकांनीच शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करावे, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्यात लाखो डी.एड., बी.एड. पदवीधारक गेले एक तप शासकीय शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे डावलून सेवानिवृत्त शिक्षकांना वेठीस धरुन २० हजार रुपयांंच्या मानधनावर नियुक्त्या करणे हा अजब कारभार आहे. सुदैवाने अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या संघटनानी या निर्णयाला कठोर विरोध केला आहे. सामाजिकविरोध, शैक्षणिक संस्था, तसेच राजकीय पक्षांनीही विरोध दर्शविला आहे, असे स्पष्ट करून चव्हाण यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात ५० हजार प्राथमिक शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या भरतीचे सोपस्कार पुर्ण होण्यास किती अवधी लागेल हे सांगणे कठीण आहे. तरी प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि डी.एड., बी.एड. बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या मिळवून देण्यासाठी समाजातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पालकांच्याआंदोलनात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.