पुरुषांची वटपौर्णिमा ! १४ वर्षांची अनोखी परंपरा

कुडाळ मध्ये पुरूषांनीही घेतले वडाला सात फेरे
पत्नीप्रती जपला जातोय सन्मान
निलेश जोशी । कुडाळ : आज वटपौर्णिमा ! जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेच व्रत करतात. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुष मंडळी गेली १४ वर्ष वट पोर्णिमेला हेच व्रत करताहेत. यंदासुद्धा हि परंपरा जपण्यात आली. महिलांच्या बरोबरीनं या पुरुषांनी वटवृक्षला फेऱ्या मारून आपल्या पत्नीप्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम जपलं. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर यांनी १४ वर्षांपूर्वी हि परंपरा सुरु केली.

कुडाळमध्ये श्री गवळदेव मंदिराकडे असलेल्या वटवृक्षाची पूजा करून त्याला फेऱ्या मारून हे व्रत पुरुषमंडळी सुद्धा करत आहेत. ही सर्व मंडळी आज सकाळी गवळदेव मंदिर इथं जमली. देवाला श्रीफळ ठेवून सांगणं करण्यात आलं. त्यांनतर ब्राह्मणाच्या उपस्थतीत वटवृक्षाची पूजा करून त्याला सात फेरे मारण्यात आले. आपल्या पत्नीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषानं हे व्रत करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. दोघंही समान आहेत. पत्नी जर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, सुखसही हे व्रत करते तर आपल्या पत्नीचा सन्मान राखावा यासाठी महिलांप्रमाणे पुरुषांनी सुरु ठेवलेलं व्रत खूप चांगलं असल्याची प्रतिक्रिया प्रा. अरुण मर्गज यांची पत्नी सौ. सुखदा मर्गज यांनी दिली.
यावेळी डॉ. संजय निगुडकर, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, पांडुरंग पाटकर, राजू कलिंगण, प्रथमेश हरमलकर, सुरेश वरक, बळीराम जांभळे आदी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.