प्राथमिक शाळा किर्लोस भावेवाडीचा अमृतमहोत्सवी सोहळा आदर्शवत

किर्लोस पंचक्रोशी सुजलाम सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करणार
आम. वैभव नाईक यांचे प्रतिपादन
शिक्षण हा समृद्धीचा मार्ग आहे. शिक्षणामुळे विकासाची गंगा आणणे शक्य होते. भावी पिढी शिक्षणाने समृद्ध घडविण्यासाठी ७५ वर्षांपूर्वी किर्लोस सारख्या गावात शाळेची मुहूर्तमेढ रोवत खऱ्या अर्थाने त्या काळातील पिढीने भावी पिढीसमोर आदर्श निर्माण केला. जि. प. प्राथमिक शाळा किर्लोस भावेवाडीचा हा अमृतमहोत्सवी सोहळा खऱ्या अर्थाने आदर्शवत ठरला आहे. यानिमित्ताने या गावाच्या ग्रामस्थांनी जे एकीचे बळ दाखविले आहे ते स्तुत्य आहे, असे उद्वार आमदार वैभव नाईक यांनी काढले. किर्लोस गावाच्या विकासाचे कोणतेही प्रश्न असोत, ते सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भविष्यात हा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आम नाईक म्हणाले.
मालवण तालुक्यातील किर्लोस भावेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सवी समारंभात आम. वैभव नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, केंद्रप्रमुख देऊ जंगले, किर्लोस तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा सावंत, गोपी लाड, बंडू चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रद्धा चव्हाण, मुख्याध्यापिका शिवानी पाताडे, शिक्षिका मानसी राणे, माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत भावे ,अनंत कदम, दीनानाथ भावे, दत्ताराम चव्हाण, सुरेश भावे, प्रताप भावे, शुभांगी सावंत, शशिकांत भावे,भास्कर मेस्त्री,वरवडे ग्रा. प. सदस्य मयुरी महेश मेस्त्री,आंबवणे शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेगाळ, किर्लोस गावठणवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल राणे, श्री. खाकर, ग्रा. पं. सदस्य मानसी भावे नूतन घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, पोलीस पाटील किशोर लाड, श्री रामेश्वर सोसायटीचे चेअरमन स्वानंद भावे, माजी शिक्षक विजय जाधव, वर्षा विनोद परब, उमेश मोरे,अरुण भावे, सुनिल भावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामेश्वर मंदिर ते भावेवाडी शाळा अशी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या समारंभाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आम. वैभव नाईक पुढे म्हणाले, आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण ठेवत अशाप्रकाराचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करत खऱ्या अर्थाने शाळेच्या स्मृती जोपासण्याचे काम येथील ग्रामस्थ करत आहेत. शिक्षक ,ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची साथ लाभल्यामुळे अशाप्रकाराचा कार्यक्रम होऊ शकला. भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून शैक्षणिक विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे या प्रयत्नांना आमची निश्चितपणे साथ मिळेल, असे सांगताना, ज्या प्रतिकूल परिस्थितीत शाळेची स्थापना झाली. गावकऱ्यांनी शिक्षणाचे महत्व त्या काळात जाणले. तो आदर्श खरोखरच घेण्यासारखा आहे, असे ते म्हणाले. किर्लोस व या पंचक्रोशीच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. कोणतीही समस्या आपण केव्हाही सांगा,ती समस्या आमच्यापर्यंत आणा, ती समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आम. वैभव नाईक म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ लाड, केंद्रप्रमुख देऊ जंगले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षिका मानसी राणे यांनी करतानाच शाळेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्याचप्रमाणे शाळेसाठी आवश्यक प्रश्न मांडले. तर मुख्याध्यापिका शिवानी पाताडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले तर समारोप समारंभाला मालवण प. स. माजी सभापती राजू परुळेकर, सरपंच साक्षी चव्हाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे शिक्षण श्री. सावंत , ग्रा. पं. सदस्य प्रवीण घाडीगावकर, मानसी भावे, गुरुनाथ चव्हाण, माजी सरपंच प्रदीप सावंत, प्रकाश भावे, सौ. प्रमिला भावे, सामाजिक कार्यकर्ते दया हाटले,गोठणे उपसरपंच बाबू परब, श्री. परुळेकर, उद्योजक आत्माराम उर्फ दादा भावे, पांडुरंग भावे, माजी ग्रा. पं. सदस्य शशिकांत भावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजू परूळेकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना राजू परुळेकर म्हणाले, किर्लोस भावेवाडी येथे शाळेचा अमृतमहोत्सव होत असताना विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा केला जात असलेला सत्कार आणि आठवण खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका शिवानी पाताडे व स्वानंद भावे यांनी मानले. यानिमित्ताने मनोहर पालयेकर यांच्यासह शिक्षक समिती पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन भावे व गुरुनाथ चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी