सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल जमीन अतिक्रमित धारकांची बुधवार दि 12 रोजी सावंतवाडी येथे वन हक्क परिषद

सावंतवाडी : पिढ्यानंपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगल जमिनीवर घरे बांधलेल्या, जंगल जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या, जंगलावर ज्यांचं जगणं अवलंबून आहे अशा बेरड, धनगर, ठाकर, कातकरी आणी कुणबी कुटुंबांची वन हक्क परिषद बुधवार दि 12 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सावंतवाडी नवसरणी येथे होणार आहे. या परिषदेत संपत देसाई, अंकुश कदम, प्रा अविनाश भाले यांच्यासह या क्षेत्रात काम केलेले अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील जंगल अतिक्रमित धारकांनी परिषदेला मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक राजेंद्र कांबळे यांनी पत्रकातून केले आहे.
पत्रकात पुढे असेही म्हंटले आहे कि वन हक्काचा कायदा होऊन 18 वर्षे झाली पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी आज अखेर झालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या कायद्याची अंमलबजावणी होऊन 2005 पूर्वी अतिक्रमण असलेल्या जंगल जमिनी सातबाऱ्यासह लोकांच्या ताब्यात दिल्या आहेत. ज्या गावाना जंगलामुळे वीज पाणी रस्ता मिळण्यासाठी अडचण होती त्यांनाही सामूहिक वन हक्काच्या आधारे सुविधा मिळाल्या आहेत. जंगलातील उपजावर जंगलात राहणाऱ्या लोकांचे पारंपरिक अधिकार मिळाले आहेत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे झाले नसल्याने या परिषदेत याची अंमलबजावणी कशी करावी याची दिशा निश्चित केली जाणार आहे. तरी या जिल्ह्यातील जंगल अतिक्रमित धाराकांनी नवसरणी, जेलच्या मागे होणाऱ्या परिषदेस सकाळी ठीक 11.00 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वनहक्क परिषदेचे निमंत्रक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.