आचरा येथील पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी ९३ आरोपींची निर्दोष मुक्तता

ऍड.उल्हास कुलकर्णी,मालवण यांनी आरोपींच्या वतीने मांडली बाजू
मालवण तालुक्यात आचरा येथे २०१६ मध्ये झालेल्या पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह सह ९३ आरोपींची जिल्हा सत्र न्यायालय यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.उल्हास कुलकर्णी,मालवण यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली.
याबाबत रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे, श्रमिक मच्छिमार संघ,आचरा बंदर मच्छीमार संघटना व जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विषयात ३० ऑक्टोबर २०१५ रोजी यांनी मत्स्य विभाग विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर दोन्ही गटांना मध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये पारंपारिक मच्छीमार यांच्यावर खुनाचा प्रयत्न,जबरी मारहाण,दरोडा,शासकीय कामात अडथळा (भा.द.वि.क.३०७/३९५/३२६/३२५/३५३/३३२/३३३/४५२/४३६/३३७/४२७/१४३/१४७/१४८/१४९/५०४/५०६) वगैरे गुन्हे दाखल झाले होते. या संघर्षाची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन,मासेमारी कायद्यामध्ये मोठे बदल केले होते. या प्रकरणात महिलांन वर पण गुन्हे दाखल झाले होते. पारंपारिक मच्छीमार यांचे नेतृत्व करणाऱ्या रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर,आकांक्षा कांदळगावकर,अन्वय प्रभू ,रश्मिन रोगे, सन्मेष परब सह ९३ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी मालवण येथे जेलभरोचा इशारा देत व्यापक आंदोलन केले होते.
सन २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याकामी जिल्हा सत्र न्यायालय,ओरोस येथे(नियमित खटला क्रमांक ४३/२०१६)गेली दहा वर्षे खटला चालू होता. ऍड.उल्हास कुलकर्णी,मालवण यांनी आरोपींच्या वतीने भक्कम बाजू मांडली. त्यांना ऍड.प्राची कुलकर्णी व ऍड.अमेय कुलकर्णी मदतनीस म्हणून काम बघितले. या प्रकरणी २८/०१/२०२६रोजी सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. दहा वर्षानंतर माननीय जिल्हा न्यायालय यांनी सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केल्यामुळे गुन्ह्यात आरोपी असलेल्या सर्व पारंपरिक मच्छीमार यांना योग्य न्याय मिळाला असे मत ऍड.उल्हास कुलकर्णी यांनी व्यक्त केले तसेच सर्व पारंपरिक मच्छीमार संघटना यांनी माननीय न्यायालय यांचे सर्वांनी मनःपूर्वक आभार मानले. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.





