आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी होतेय लूट

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी वेधले लक्ष

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा द्यावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रियेकरीता आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जातेय याकडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोंबर – नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी अनेक शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. यावर राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांकरिता नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली असून यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याची अट ठेवण्यात आली असून सदर ई केवायसी 25 डिसेंबर पूर्वी करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. ही ई-केवायसी करतांना जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 100/200/300 रुपये नियमबाह्य पद्धतीने दर आकारणी करून पिळवणूक करत आहेत. यावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून सर्व आपले सेवा केंद्र धारकांना केवायसी साठी दर निश्चित करून द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांची लूटमार होणार नाही. तसेच ही ई-केवायसी प्रक्रिया ग्रामपंचायत कडील सेवा केंद्रामार्फत प्राधान्याने करून देण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!