प्रवाही भाषाच जिवंत राहील – डॉ रविंद्र शिवदे

मालवणी ही अत्यंत गोड भाषा

कै लक्ष्मण साबाजी पवार – मालवणी साहित्य पुरस्कार

कै लक्ष्मण साबाजी पवार- मालवणी साहित्य पुरस्कार प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ रविंद्र शिवदे , नाशिक यांच्या हस्ते कल्पना मलये यांच्या बालकादंबरी – कारटो व विनय सौदागर यांच्या काव्यसंग्रह- सभोवताल याना मालवणी भाषा गौरव दिन
04 एप्रिल 2023 रोजी ऑनलाइन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूहाचे शुभांगी पवार, स्नेहा राणे सरंगले डॉ धनंजय रासम व डॉ सतीश पवार हजर होते.

माझे वडील दिवसाचे काम आटोपून सायंकाळी आपल्या इरसाल मित्रमंडळी सोबत आमच्या घरच्या लोट्यावर गप्पा मारत बसत. त्यांच्या गप्पांमधील रसाळपण माझ्या लेखनात उतरले आहे. माझ्या कवितांतून मी वाईट सामाजिक रुढींवर प्रहार केले आहेत. सामाजिक समतेसाठी काम करणारी मंडळी मला हा पुरस्कार देत आहेत, या कारणामुळे मला हा पुरस्कार जास्त रकमेच्या पुरस्कारापेक्षा प्रिय आहे. हा पुरस्कार मी माझे बाबा व त्यांचे इरसाल मित्र याना अर्पण करतो असे विनय सौदागर पुरस्कार प्रदानाला उत्तर देताना म्हणाले.

एका दिवाळी अंकात लिहिलेल्या एका कथेने मालवणी खट्याळ कारटो याचा जन्म झाला व माझे व आजूबाजूचे अनुभव यातून मालवणी भाषेतील ही पहिली बालकादंबरी प्रत्यक्षात आली. आता त्याची चौथी आवृत्ती निघत आहे. मालवणी मुलखातील प्रत्येक तरुणाला ही कादंबरी त्यांच्यावरच लिहिली आहे असे वाटते व याच्या दुसऱ्या भागाची मागणी होत आहे हे या कादंबरीचे यश आहे. गंभीर वैचारिक लेखन करत असताना मी बालसाहित्याकडे वळले. बालसाहित्य लिहिणे सोपे आणि कठीण सुद्धा असते. माझ्या पाठीवर इथल्याच स्थानिक प्रतिष्ठानने मारलेली कौतुकाची ही थाप मला इतर पुरस्कारांपेक्षा महत्वाची वाटते. असे मनोगत कल्पना मलये यांनी व्यक्त केले.

मालवणी ही अत्यंत गोड भाषा आहे असे सांगून नाशिक येथील प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ रविंद्र शिवदे यांनी आपले आजोबा अ शि देसाई (टोपीवाला ) मालवणकर यांच्या मुंबईच्या कारखान्यात कामाला होते, त्यामुळे बालपणात मी मालवणी लोकांसोबत वावरलो आहे अशी आठवण सांगितली.
जी केवळ बोलली जाते, लिहिली जात नाही , ती बोलीभाषा. महाराष्ट्रामधील अनेक बोलीभाषामध्ये मालवणी व अहिराणी या दोन बोली भाषा सर्वात जास्त विकसित झालेल्या आहेत. घरात बोलली जाणारी भाषा ही केवळ भाषा नसून ती अस्मिता, परंपरा, संस्कृती, चालीरीती, पूर्वजांच्या आठवणी यांच्याशी निगडित असते. म्हणून बोलीभाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कोणतीही भाषा ही कायम टिकणारी नसते. भाषा इतराना सामावून प्रवाही असेल तरच ती जिवंत राहते. आपली भाषा अनंतकाळ टिकेल अशी अपेक्षा करणे चुकीचे. भाषेत रुपांतर बदल होतच असतात. विविधता हा या जगाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे भाषेचे एकत्रीकरण करणे फार कठीण आहे. निसर्गाच्या प्रवाहात हळूहळू बोलीभाषा लुप्त होऊन प्रमाणभाषा वाढत जाणार आहेत. तरीही बोलीभाषा टिकवायचा प्रयत्न केलाच पाहिजे कारण आपली सुखदुःखे तिच्याशी निगडित आहेत. सुदैवाने मालवणी भाषेची एकंदर खूप चांगली परिस्थिती आहे. मालवणी भाषेवर प्रेम करणारी अनेक माणसे आहेत. त्यामुळे तिची काळजी करायची गरज नाही. असे प्रतिपादन भाषातज्ज्ञ डॉ रविंद्र शिवदे यांनी केले.

विनय सौदागर यांच्या सभोवताल या काव्यसंग्रहाला व कल्पना मलये यांच्या कारटो या मालवणी पहिल्या बालकादंबरीला मालवणी मातीचा, इथल्या झाडापेडांचा, पाण्याचा, निसर्गाचा, इथल्या बेरकी माणसाचा सुगंध आहे असे डॉ सतीश पवार व स्नेहा राणे सरंगले यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. आभार प्रदर्शन स्नेहा राणे सरंगले यांनी केले.

रोख रक्कम पाच हजार रुपये विभागून व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून कै लक्ष्मण साबाजी पवार यांच्या नावाने देण्यात आला. लक्ष्मण साबाजी पवार हे नरडवे ता. कणकवली येथील शेतकरी, नेते व 1960 च्या दशकातील कणकवली पंचायत समितीचे सदस्य होते.

मालवणी भाषा दिवस हा 04 एप्रिल रोजी मच्छीन्द्र कांबळी यांच्या जन्मदिनी त्यांच्या मालवणी भाषेची पताका जगभर नेण्याच्या कामगिरीला अभिवादन करायला साजरा केला जातो. त्याचबरोबर गंगाराम गवाणकर यांचेही नाव मालवणी भाषेसोबत अविभाज्यपणे जोडले गेले आहे.

error: Content is protected !!