बेळगाव-कणकवली एसटी बस पूर्ववत करा !

प्रवासी वर्गाकडून होतेय मागणी, एसटी प्रशासनाने बसफेरी कायमचीच बंद केल्याने प्रवाशांना सोसावा लागतोय मोठा आर्थिक भुर्दंड
कुडाळ : कणकवली आगाराची बेळगावहून संध्याकाळी ५.३० वाजता सुटणारी कणकवली-बेळगाव ही एसटी बस पुन्हा पूर्ववत करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे ही बसफेरी सुरु होती. मुख्य म्हणजे सावंतवाडी ते कणकवली या मार्गावर धावणारी ही शेवटची एसटी बस आहे. या बसचा फायदा बेळगाव येथे एका दिवसात जाऊन येणाऱ्या प्रवाशांना विशेष करून सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांना होत होता. बेळगाव ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल आणि कणकवली तसेच महामार्गावरील अन्य गावातील व्यापारी वर्गाला कणकवली-बेळगाव या बसचा फायदा होत होता. तसेच रात्री उशिरा कामावरून सुटणाऱ्या सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील प्रवाशांना या बसमुळे घरी वेळेत पोहोचता येत होते. मुख्य म्हणजे या एसटी बसफेरीमुळे कणकवली आगाराला चांगले अर्निंग (कमाई) सुद्धा मिळत होते.
मात्र, कोरोना काळात ही बसफेरी बंद झाली. त्यामुळे रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांचे तसेच लोकल प्रवाशांचे हाल झाले. ही बस सावंतवाडी येथे रात्री ८.१५ च्या सुमारास तर कुडाळ येथे ८.३५ पर्यंत येत असल्याने प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येत होता. पण ही फेरीच एसटी प्रशासनाने कायमचीच बंद केल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रवाशांना अनेकदा रिक्षासाठी ८ ते १० किमीसाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. तसेच मुंबईहुन कुडाळमध्ये रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना या बसचा फायदा होत होता. परंतु, ही बस बंद केल्याने रिक्षा करून घर गाठावे लागते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असून कणकवली-बेळगाव-कणकवली ही बसफेरी पुन्हा सुरु करून प्रवाशांच्या होणारी गैरसोय एसटी प्रशासनाने दूर करावी, अशी मागणी होत आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ