अपघातातील चौघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नारिंग्रे येथील झालेल्या भीषण अपघातील आचरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी) यांच्यावर शोकाकुल वातावरणात देऊळवाडी, पिरावाडी व गाऊडवाडी येथील सम्शानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. दुःखद वातावरणात सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. अपघातातील जखमी रघुनाथ बिनसाळे यांच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार चालू आहेत.

रिक्षा व्यावसायिकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रिक्षा व्यवसायावर कुटुंबाची गुजराण करणारया चारही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यविधी दरम्यान कुटूंबातील सदस्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.यातील तिघांची मुले अल्पवयीन असून एक अविवाहित आहे. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या या पाचही रिक्षा व्यावसायिकांच्या कुटूंबियांसमोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे.
आचरा वरचीवाडी येथील संकेत सदानंद घाडी यांना छोटा एक वर्षाच्या मुलासह पत्नी, वडील, आई, भाऊ, व नातेवाईक असा परिवार आहे. आचरा गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर हे अविवाहित असून आई, भाऊ, व नातेवाईक असा परिवार आहे. आचरा गाऊडवाडी येथील रोहन मोहन नाईक यांना नुकतीच पहिलीत जाणारी मुलगी व एकदम छोटा मुलगा पत्नी, भाऊ आई असा परिवार आहे. पिरावाडी येथील सोनू कोळंबकर यांची इयत्ता सहावी मध्ये जाणारी मुलगी, तीसरीमध्ये शिकणारा मुलगा, पत्नी, वयोवृद्ध आई, भाऊ, भावजय असा परीवार आहे.

व्यापारी संघटना व रिक्षा संघटनानी बंद पाळून वाहिली श्रद्धांजली

अपघाताच्या घटनेनंतर आचरा गाव शोक सागरात बुडाला होता. तरुणांच्या दुःखद निधनाच्या घटनेनंतर आचरा व्यापारी संघटनेने दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच आचरा रिक्षा संघटनानी रिक्षा बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुटूंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

error: Content is protected !!