स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई केल्यास हायवे च्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करा!

फळ फुले भाजीपाला विक्रेता संघटनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
नगरपंचायत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज खालून हटणार नाही
संघटनेचे संस्थापक अनिल हळदीवे यांचा इशारा
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील भाजी विक्रेत्यांना नगरपंचायत पर्यायी जागा देत नाही, तोपर्यंत आम्ही तेथून हटणार नाही असा इशारा भाजी व फळ फुले विक्रेता संघटनेच्यावतीने आज देण्यात आला. तसेच अतिक्रमण हटाव कारवाई करायची असेल तर ती सरसकट करा त्यामध्ये आर ओ डब्ल्यू मधील बांधकामे देखील हटवा. फक्त भाजी विक्रेते टार्गेट करू नका. कणकवली शहरांमध्ये अनेक परप्रांतीय हे भाड्याने जागा घेऊन किंवा जागा खरेदी करून आपले बस्तान थाटून आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? मात्र पटवर्धन चौकातील ब्रिज खाली बसणाऱ्या स्थानिक विक्रेत्याना व्यापारी संघाचा विरोध का? असा सवाल कणकवली शहरातील स्थानिक फळफुले भाजी विक्रेता संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष अनिल हळदिवे यांनी उपस्थित केला आहे.
कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांची आज या संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी श्री हळदीवे यांच्यासोबत राजू पेंडुरकर, दादा पावसकर, परेश वाळके, सागर चव्हाण, बाळू जैताळकर आदी उपस्थित होते.
कणकवली शहरातील बाजारपेठ दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांबाबत नगर पंचायत, व्यापारी संघटना आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त पाहणी केली होती. यात पटवर्धन चौका लगत फ्लाय ओव्हर ब्रिज चे दोन गाळे रिकामे करून तेथे सुशोभिकरण करण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली होती. त्याअनुषंगाने तेथील भाजी विक्रेता संघटनेने आज मुख्याधिकारी गौरी पाटील यांची नगरपंचायत येथे भेट घेतली. या भेटी नंतर भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना श्री.हळदिवे म्हणाले, नियमात होत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आमचा विरोध नाही. पण फ्लाय ओव्हर ब्रिजखालील पटवर्धन चौका लगतच्या दोन्ही गाळ्यांमध्ये सुमारे 15 स्थानिक भाजी विक्रेते बसतात. त्यांना हटवायचे असेल तर आम्हाला पर्यायी जागा द्या अशी मागणी आम्ही नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. मुख्याधिकारी यांनी आमची बाजू ऐकून घेतली आहे. दरम्यान कणकवली शहरात चौपदरीकरणानंतर हद्द निश्चित करण्यात आली होती. मात्र या हद्दीतील अतिक्रमणे नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरणाने हटविलेली नाहीत. उलट तेथे अनेक अनधिकृत बांधकामे आणि व्यवसाय सुरू झाले आहेत. जर नगरपंचायतीला कारवाई करायची असेल तर सरसकट सर्वच अतिक्रमण झालेल्या ठिकाणी कारवाई करावी. फक्त भाजी विक्रेत्यांना टार्गेट केले जाऊ नये. मागच्या वेळी परप्रांतीय विक्रेत्यांना हटवण्यासंदर्भात ज्यावेळी वाद झाला त्यावेळी व्यापारी संघटना आमच्या सोबत आली नाही असा आरोप देखील श्री हळदिवे यांनी केला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली