कणकवली शहर विकासात प्रदीप मांजरेकर यांची योगदान काय?

जनतेची कामे करणाऱ्यांसोबत सदैव अबीद नाईक असणार
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांचा मांजरेकर यांना टोला
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील स्टॉल व विक्रेत्यांना हायवेने हटवले तरी कणकवली नगरपंचायत या विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून विक्रेत्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नगरपंचायत शहरात विविध विकास कामे करत असताना विकास कामांच्या माध्यमातून नगरपंचायतीची घोडदौड सुरू आहे. मात्र कणकवली नगरपंचायत वर टीका करणाऱ्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांना निवडणूक जवळ आल्यानंतरच या स्टॉल धारकांची आठवण कशी यावी? एवढे दिवस हे मांजरेकर झोपी गेले होते का? त्याच बरोबर करोना काळात दोन वर्षात कणकवलीतील जनतेला आधार देण्याची खरी गरज होती त्यावेळी कुठे होता. असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी उपस्थित केला आहे. प्रदीप मांजरेकर यांनी नगरपंचायत वर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार श्री नाईक यांनी घेतला आहे. कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी शहराचा विकास करून त्याच्या गप्पा मारतात.व जनतेची कामे करणाऱ्या सोबत सदैव अबिद नाईक असणार व मागील 5 वर्षात कणकवलीच्या जनतेची प्रत्येक कामे कोणी केली व होत असलेल्या चांगल्या विकास कामांना कोणी विरोध केला हे कणकवली तील जनतेला चांगले माहीत आहे. परंतु नगरपंचायत वर टीका करणाऱ्या प्रदीप मांजरेकर यांचे कणकवली शहराच्या विकासात योगदान काय? असा सवाल श्री. नाईक यांनी केला आहे. निवडणूक आल्यावर स्टॉल व विक्रेत्यांना उठवायचे हा मांजरेकर यांचा आरोप धादांत खोटा असून, ही कारवाई नगरपंचायतने नाही तर हायवे ने केली आहे. रस्त्यांना खड्डे राहिले की रस्त्यांची दुरवस्था म्हणून बोंब मारायची आणि रस्त्यांची सुस्थितीत कामे करण्यासाठी डांबरीकरण केले की डांबर घालून विकास होत नाही अशी उलटी बोंब मारायची. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून शहराच्या विकासाचे काम सुरू असून, शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवणाऱ्यांना जनतेचे प्रश्न समजतात असा टोला श्री नाईक यांनी लगावला.
दिगंबर वालावलकर /कणकवली