देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू
देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय
देवगड वासियांना मुबलक पाणी
पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार
कणकवलीत आयोजित बैठकीत निर्णय
कणकवली येथील विश्रामगृहावर देवगड-जामसंडेच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. कोर्ला सातंडी धरणावर आधारित नवीन योजना अस्तित्वात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी दिले गेले.
असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अडचणी
देवगड-जामसंडे नगरपंचायत सन १ एप्रिल २०१८ रोजी अन्नपूर्णा नदीवरील स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली होती. मात्र, ही योजना १२ किमी लांब दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीवर आधारित आहे. नदीतील खाऱ्या पाण्याचा प्रभाव, गंजलेली जलवाहिनी आणि मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे उन्हाळ्यात पाणी उपशासाठी अडथळे निर्माण होतात. परिणामी, देवगड-जामसंडे नगरपंचायतीला दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
नवीन प्रकल्पासाठी पुढील पावले
सदर परिस्थितीचा विचार करून कोर्ला सातंडी धरणावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत कायमस्वरूपी आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
नामदार नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.