राणे कुटुंबीयांकडून माझे खच्चीकरण! राजन तेलींचा खळबळ जनक आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत माझा पराभव केला
एकाच घरात तिघांना उमेदवारी, ही घराणेशाही मान्य नाही
राजन तेलींच्या खळबळजनक आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांवर आरोप करत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राणेंवर घराणेशाही चा आरोप करत असताना राणे कुटुंबीयांकडून खच्चीकरण करण्याचा तसेच त्रास देण्याचा होत असलेल्या प्रयत्नला कंटाळून पक्ष सदस्यत्व व विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे तेली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली असून, राजन तेलींच्या या राजकीय निर्णयामुळे सावंतवाडी मतदारसंघात राजकीय गणिते बदलणार आहेत. प्रामुख्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरून माझा राजकीय पराभव केला असा देखील आरोप तेली यांनी केला आहे. या राजीनामा पत्रात तेली यांनी म्हटले आहे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करत पक्ष वाढीसाठी काम केले. 2019 मध्ये सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या अधिकृत उमेदवारी विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला म्हणून मला देखील भाजपचा एबी फॉर्म दिला होता. परंतु शिवसेनेने जरी चूक केली तरी आपण चूक करता नये असा मला निरोप आल्यानंतर माझ्याकडे एबी फॉर्म असून सुद्धा हा फॉर्म पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानंतर मी दिला नाही. भाजपमध्ये आलेल्या राणे कुटुंबीयांकडून सातत्याने त्रास होत असून त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी भाजपामध्ये प्रवेश केला होता. केवळ बांद्यामध्ये असणारी भाजप सावंतवाडी मतदारसंघात वाढवण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र त्यानंतर भाजपामध्ये आलेल्या राणे कुटुंबाकडून आमचे खच्चीकरण केले जात असून त्यांच्यापासून दूर गेलेल्या लोकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घोडगे सारख्या ग्रामीण भागातून मी आलो असून ज्या पक्षात मी आतापर्यंत गेलो होतो तेथे शंभर टक्के प्रामाणिक काम केले. मात्र घराणे शाही करत एकाच कुटुंबातील एकाला लोकसभा व दोघांना विधानसभा व यांच्या कलाने चालणाऱ्या तिसऱ्याला देखील विधानसभा ही घराणेशाही मला मान्य नाही. असा आरोप या राजीनामा पत्रात तेली यांनी केला आहे. या सर्व बाबी मी पक्षांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणल्या मात्र या पक्षाच्या वरिष्ठांचाही नाईलाज असू शकतो. तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे. अशा शब्दात राजीनामा पत्रात राजन तेली यांनी भाजपच्या नेत्यांची ऋण व्यक्त केले आहेत. हा राजीनामा मंजूर करावा याकरता त्यांनी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना या पत्राची प्रत दिली आहे. मात्र राजन तेली यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडताना राणेंवर राजन तेली यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपामुळे जिल्ह्यातील वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.




