भिरवंडे, हरकुळ, सांगवे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या!

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट

डोंगर माथ्यावरील दगड, गोटे रोखण्यासाठी गॅबियन बंधारे बांधा

सतीश सावंत यांची तहसीलदारांकडे मागणी

कणकवली तालुक्यातील भिरवडे, गांधीनगर, हरकुळ खुर्द, सांगवे, येथील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच मे महिन्यामध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे हरकुळ बुद्रुक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड व तालुक्यातील घरे व फळ बागायती चे नुकसान झाले होते. ही भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी डोगर पायथ्याशी असलेल्या या गावांमधून मोठ्या प्रमाणावर दगड, झाडे वाहून ही तेथील पुलावर येत आहेत. त्यामुळे नदीच्या गाळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हे रोखण्याकरता गॅबियन बंधारे घालण्याची मागणी श्री सावंत यांनी केली. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली. शक्य असल्यास एम आर इ जी एस मधून ही कामे होतील का ते पहा अशी मागणी सावंत यांनी केली. भिरवंडे येथे पायवाटा, चिरेबंदी कंपाऊंड तसेच विहीरीचं नुकसान झालेले आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच गाधीनगर येथील वरचीवाडी येथे पायवाट वाहून गेली आहे. तसेच चार विहीरीमध्ये गाळ साचला असून त्या ढासळाल्या आहेत. आणि गावातील सर्व शेतकऱ्यांची हेक्टरोनी शेती वाहून गेली असून त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. मेस्रीवाडीत घरामध्ये पाणी शिरून घरातील भांडी तसेच जीवनावश्यक वस्तु वाहून गेल्या आहेत. हरकुळ खुर्द येथे गोठा वाहून गेला असून तेथील शेतीसुद्धा वाहुन गेली आहे. व तेथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सांगवे गावात घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झालेले आहे. तसेच सुनिल कांबळे, आंबेडकर नगर यांच्या पोल्ट्रीतील सुमारे 443 कोंबडी वाहून मृत पावली आहेत. ही संपूर्ण परिस्थिती पाहता अतिशय भयावह आहे. तरी त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. तसेच यावेळी जिल्हा बँकेची माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी हरकुळ बु व तालुक्यातील अन्य भागांमधील येथे झालेल्या मे महिन्यातील नुकसानीची भरपाई कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला. त्यावर या नुकसानीतील कृषी विभागाच्या नुकसानीची काही रक्कम जमा झाली असून घरांची नुकसानीची रक्कम शासनाकडून यायची आहे. ती आल्यावर तातडीने दिली जाईल अशी ग्वाही तहसीलदार यांनी दिली. तसेच या भागातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव पाठवा अशी मागणी श्री सावंत यांनी केली. त्यावर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी कळविण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले. यावेळी सचीन सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उत्तम सावंत, उपजिल्हा युवासेना मुकेश सावंत,अविनाश सावंत, सुनील कांबळे, संतोष सावंत, संजय तोरसेकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!