वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या कोकणातील आंबा, काजु नुकसानीची भरपाई द्या!

आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

विदर्भातील निकषानुसार कोकणातही आंबा, काजू व नारळ फळ झाडांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार शिवसेना उपनेते राजन साळवी यांच्यासह आमदार वैभव नाईक व सुनील प्रभू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कोकणात ६ व ७ मार्च रोजी झालेल्या सुसाट वादळी वाऱ्यामुळे आंबा मोहर, काजू व नारळ फळ झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे. या बाबत विधानसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते ह्यांनी मांडलेल्या प्रश्नानुसार विदर्भातील झालेल्या नुकसानाची तात्काळ पाहणी करून व पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे आपल्या स्तरावरून आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे कोकणातील झालेल्या नुकसानाची तात्काळ पाहणी करून पंचनामे बनून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी ह्याबाबतचे निवेदन आज शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉ. राजन साळवी व आमदार वैभव नाईक ह्यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!