अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्या-विनायक राऊत यांची मागणी

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याजवळ केली आहे. श्री राऊत यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात असे म्हटले की, रविवार 7 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने (पाण्याचा निचरा न झाल्याने) लोकांच्या घरात पाणी घुसले किंबहुना काही ठिकाणी घरेच पाण्याखाली गेलेली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडून घरे उद्धवस्त झालेली आहेत. काही घरे, गुरांचे गोठे कोसळले असून नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व सामान भिजल्याने त्यांच्यापुढे अत्यावश्यक सामान कपडे, अन्नधान्य इ. ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन, शेती वाहून गेलेली असून शेतकऱ्यांची मोठी हानी झालेली आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी गेल्याने बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने व्यापा-यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. तरी वरील सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ होऊन लवकरात लवकर सर्व संबंधित नुकसानग्रस्तांना भरीव मदत देणेकामी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात यावी असे म्हटले आहे.

error: Content is protected !!