मोफत-माफक दरात धान्य, आश्वासनांचा खैरातींमुळे देशातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार आदी वर्ग नेस्तनाबूत होत आहे

शेती-बागायतींसाठी मजूरच मिळत नसल्याने अन्नधान्यांची टंचाई भेडसविणार
देशाची अधोगतीकडे वाटचाल -भाई चव्हाण
कणकवली – मतांच्या बेगमीसाठी भारतातील ८० कोटी नागरिकांना मोफत अथवा माफक दरात धान्य, गरीबी उच्चाटनाच्या नावाखाली सत्ताधार्यासह, विरोधकांकडून विविध प्रकारच्या आश्वासनांची खैरात आदी कारणांमुळे सद्या शेतकरी, व्यापारी, कारखानदार आदी वर्गांना कामे करण्यासाठी कामगार, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. या वर्गांवर स्वत:ची उपजिविकेची साधने कशी शाबूत ठेवावी, या विवेचनेने ग्रासले आहे. परिणामी हा वर्गं हळूहळू नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. अन्नधान्यांची टंचाई निर्माण होण्याची साधार शक्यता निर्माण झाली आहे. देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून त्यावर अभ्यासकांनी मार्ग दाखविण्याची गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सद्या देशात लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहे. भारतातील २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्यावर आणले गेले आहे. पण त्याचवेळी ८० कोटी जनतेला मोफत अथवा माफक दरात धान्य पुरविले जात आहे, असे जाहीर केले जात आहे, असे या पत्रकात नमूद करुन ते म्हणतात, आझाद हिंद शेतकरी संघटना ही देशातील बहुसंख्य राज्यात कार्यान्वित आहे. गरीबांना सरसकट मोफत अथवा अल्प किंमतीत धान्य पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये खरच किती गरजवंत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी दारिद्र्य रेषेखालील यादी तयार करण्यात आली. या २० वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बहुसंख्यांचा आर्थिक स्तर कमालीचा उंचावला आहे, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणतात, चारचाकी गाडीतून स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणायचे आणि खुल्या बाजारात पाच-सहा पट्ट किंमतीत विकायचे आणि घरी मात्र दर्जेदार धान्य आणायचे, असा फंडा सुरू झाला आहे. त्याच बरोबर खरच गरजवंत असणार्यांच्या घरात १००/१५० रुपयांच्या घरात धान्य येते. बाकी खर्चासाठी तो महिन्यातील ४/६ दिवस काम करतो. घरची शेती करण्याच्या व्यापात पडत नाही अथवा घरातील कर्ती सवरती मंडळी शेतीत, व्यापारी, कारखानदारी आदी वर्गांकडे कामासाठी जायला पाठ फिरवितात. परिणामी या वर्गांला आपली ही क्षेत्रे कशी टिकवायची या विवेचंनेने ग्रासले आहे.
अनेक राज्यांतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुसंख्य आस्थापनांच्या दर्शनी भागात कामासाठी कामगार, मजूर पाहिजेत, असे फलक महिनोन्महिने लटकलेले दिसतात. मात्र मोफत, माफक दरात धान्य मिळत असल्याने देशातील एक पिढी आम्ही आळशी बनविली आहे. त्यांच्या स्वप्नांचे पंखही छाटले गेले आहे, अशी वस्तुस्थिती विशद करून चव्हाण म्हणतात. देशातील सर्वंच पक्ष सत्तेवर येण्यासाठी मतांच्या बेगमीसाठी साखर पेरणी करत असतात. मात्र या साखर पेरणीमुळे आपण देशाला अधोगतीकडे नेत आहोत, याचे सोयरसुतक कोणालाच दिसत नाही. शेत जमीनी पड राहण्याच्या परिणामी देशाला धान्य परदेशांतून आयात करावे लागेल. कामगार, मजूरांअभावी विविध क्षेत्रांतील आस्थापना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत . या बाबींचा फटका प्रामुख्याने कनिष्ठ, मध्यम, ज्येष्ठ मध्यमवर्गींयांना जाणवू लागला आहे. भविष्यात या बाबींचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत. मतदान करताना आता या बाबींची दखल घेण्याची वेळ आली आहे. तसेच देशातील तज्ज्ञ अभ्यासकांनी देशाला अशा अधोगतीतून वाचविण्यासाठी मार्ग दाखविण्याची गरज आहे.