शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न

मालवण : राज्यातील शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची ताकद धगधगत आहे.त्यामूळे हीच ताकद आणि साहेबांच्या विचाराच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले गेले आहे तरीही येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळायला हवे यादृष्टीने कामाला लागा. असे आवाहन ज्येष्ठ शिवसेना नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, गणेश कुडाळकर, यतीन खोत, बाबी जोगी, बाळ महाभोज, मंदार ओरसकर, सेजल परब, श्वेता सावंत, शिल्पा खोत, अमित भोगले, अरुण लाड, बंडू चव्हाण, समीर लब्दे, राजेश गावकर, कमलाकर गावडे, विजय पालव, प्रवीण लुडबे, पूजा तोंडवळकर, शिला गिरकर, सन्मेश परब, तृप्ती मयेकर, भारती आडकर, भगवान लुडबे, सिया धुरी, रणजित परब, लता खोत, आशिष परब यांच्यासह उपशहर प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, ग्रामपंचायत सदस्य अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, निसर्गाचा रहासन होता जिल्ह्याचा विकास व्हायला हवा यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. सध्याचा काळ हा संकटाचा असला तरी उद्धव ठाकरे संघर्ष करत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी, खाचखळगे आहेत. मात्र शेवटी विजय निश्चित आहे. विकास करत असताना प्रत्येक हाताला काम द्यायला हवे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील शिवसैनिकांप्रमाणे येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव, चिन्ह चोरले गेले आहे तरीही येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळायला हवे यादृष्टीने कामाला लागा. गावागावात जाऊन उद्धव ठाकरे यांचे विचार पोहचवा. येत्या काळात या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा चंग सर्वांनी बांधून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
आमदार नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे आमदार, खासदार सोडून गेले चार दिवसांपूर्वी नाव आणि चिन्ह गेले आणि आज ज्या पक्षाला नाव नाही अशा पक्षाचे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने एकत्रित आले ही मालवणातील शिवसैनिकांची ताकद आहे. तळागाळातील ताकद, शिवसैनिक हा अशा वादळाला हलणार नाही हे आजच्या उपस्थितीवरून दाखवून दिले आहे. शेवटचा आमदार सोडून गेला तरी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहणार तुम्ही कितीही चौकशा लावा, दबाव आणा तरी आम्ही ठाकरेंसोबत राहणार. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांमुळे, भाई गोवेकर यांच्या मार्गदर्शनामुळे दोनवेळा आमदार झालो. त्यामुळे लढायचं ते जिंकेपर्यंत आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे शिवसेनेसोबत राहणार आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे कारण ज्या ज्यावेळी शिवसैनिक पेटून उठतो त्या त्यावेळी त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. जे जे शिवसेनेला सोडून गेले त्यांचे काय झाले याचे उत्तम उदाहरण हा मतदार संघ आहे. आणि जे ४० आमदार गेले त्यांचे काय होणार हे सांगण्याची गरज नाही.
आज भाजप निवडणुकीपासून लांब पळत आहे. जिल्हा परिषद, पालिका निवडणुका आहेत. कधीतरी निवडणूका या घ्याव्याच लागणार आहेत. या निवडणुकांची लोक वाट बघत आहेत. भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध करून दिला. ज्यावेळी कोरोना महामारीचे संकट, तोक्ते वादळाचे संकट होते त्यावेळी सर्वप्रथम शिवसैनिकच मदतीसाठी धावून आला होता. त्यावेळी भाजपची ही माणसे कुठे होती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!