व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवावा, अशी मागणी मच्छीमार सेल, भाजपा, सिंधुदुर्गचे जिल्हा संयोजक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री. तोरस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयतांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी 19 कोटी रुपयाची 19 किलो वजनाची उलटी संशयीतांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. .
तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयित यांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनवली आहे अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. तसेच काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. तसेच तपासा दरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याची वृत्त हाती आली आहे.
संबंधित विषयात पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने चालला आहे .त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी, मच्छीमार सेल यांनी घेतली असून आज होणाऱ्या कुडाळ येथील बैठकीत सदर विषयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे या विषयात लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. . मच्छिमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री. तोरसकर यांनी कळविले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.