आमदार नितेश राणेंच्या निधीसाठी कणकवली नगरपंचायत च्या बजेट मध्ये तरतूद करा!

या मागणी वरून नगरसेवक सुशांत नाईक सत्ताधाऱ्यांमध्ये रंगला “सामना”

कुडाळच्या आमदारांवर “भरोसा” ठेवू नका

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून नाईकांना कोपरखळ्या

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा १ कोटी ६१ लाख ४९ हजार ७०८ रूपये शिलकी अर्थसंकल्‍प आज नगरपंचायत सभागृहात सादर करण्यात आला. नगरपंचायतीचा एकूण अर्थसंंकल्‍प ५० कोटी ५८ लाख ३१ हजार ४०८ रूपयांचा आहे. कणकवली नगरपंचायत च्या अर्थसंकल्पीय बैठकीत यावेळी आरोप प्रत्यारोपां ऐवजी टोलेबाजी व कोपरखळ्यानी ही बैठक लक्षवेधी ठरली. नगरपंचायतच्या अर्थसंकल्पात काही बदल सुचवत असताना विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांनी युडीसिक्स अंतर्गत बजेटमध्ये ठेवलेल्या तरतूदीत वाढ करा कारण क्रीडांगण केले जात असेल तर ती तरतूद वाढवली पाहिजे अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी क्रीडांगण झालं पाहिजे ही तुमची सुद्धा मागणी आहे ना असे म्हणत त्यांना टोला लगावला. तर नगरपंचायत च्या आज सादर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये खासदार निधीसाठी 15 लाखाची तरतूद केली. परंतु आमदार निधी साठीची केवळ 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. ही तरतूद वाढवा कारण आमदार स्थानिक आहेत. अशी मागणी सुशांत नाईक यांनी करत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. त्यावर उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आमदार निधीसाठी बजेटमध्ये तरतूद वाढवण्याची गरज नाही. कारण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून एवढा निधी आलाय यात नुकताच दहा कोटी चा निधी पण मिळाला. यामुळे आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. तुमचे झाले की माहिती नाही असा टोला लगावला. खासदार निधीच्या तरतुदीत अजून वाढ करायची होती पण निधी द्यायची खोटी दिलेली आश्वासने पुरी केली नाहीत असा टोला हर्णे यांनी लगावला. कणकवलीतील आमदारांजवळ तीन नगरपंचायती आहेत. मात्र कुडाळ मालवणच्या आमदारांकडे दोनच नगरपरिषदा आहेत. कुडाळ – मालवणला त्या आमदारानी तेथे त्यांनी किती निधी दिला? असा सवाल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी करत चेंडू सुशांत नाईक यांच्याकडे टोलवला. तसेच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बदललेल्या राजकीय स्थितीत तुमच्या काही बदल व्हायचे आहेत का? व्हायचे असतील तर लक्ष ठेवा तुमच्या कुडाळ मालवणच्या आमदारांना विचारून घ्या. त्यांच्यावर भरोसा ठेऊ नका, कारण कुडाळ मालवणचे आमदार तुम्हाला काहीही न सांगता काहीतरी निर्णय घेतील. असा टोला नलावडे यांनी लगावला. त्यावर सुशांत नाईक यांनी काही लोक ईडी ला घाबरून गेले. आम्ही तसे जाणारे नाही. आम्ही चर्चा करूनच निर्णय घेतो. असे प्रत्युत्तर सुशांत नाईक यांनी दिले. त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कुडाळ मालवणचे आमदार घाबरून जाणार नाहीत कारण ते मुख्यमंत्र्यांशी “क्लोज” आहेत. असा टोला लगावला. तर बंडू हर्णे यांनी कुडाळ मालवणचे आमदार अचानक जाणार नाहीत तर ते ठरवून व ठरल्याप्रमाणेच त्याच वेळेत जातील अशी कोपरखळी लागावली. कुडाळचे आमदार जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा. नाहीतर तुम्ही गडबड कराल असा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला. या चर्चेदरम्यान सभागृहात राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक हे दाखल झाले असता सुशांत नाईक यांनी बजेटमध्ये अल्पसंख्यांक हेडला निधीची तरतूद करा अशी मागणी केली. त्यावर अबीद नाईक यांनी गेल्या चार वर्षात तुम्हाला या हेडच्या निधीची आठवण झाली नाही. व आताच कशी झाली? असा सवाल उपस्थित केला. तेव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाईक तुम्ही आणि तुमच्या कुडाळच्या आमदारांनी कितीही कांडी फिरवला तरी हे गणित माझ्याशी जुळलेले आहे. असे सांगत येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपाचे युतीचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले. यावेळी अबीद नाईक यांनी चिन्ह व नाव जाते तिथे कोणीही जाऊ शकेल असे सांगत सुशांत नाईक यांना टोला लगावला. त्यावेळी सुशांत नाईक यांनी आमची महाविकास आघाडी आहे असे सांगताच अबीद नाईक यांनी आपण या विषयावर नंतर बोलू येथे चर्चा नको असे सांगत विषयावर पडदा टाकला. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमध्ये नगराध्यक्ष मानधन या हेडवर चर्चा आली असताना नगरसेवकांचे मानधन वाढवता येतं का पहा असा मुद्दा नलावडे यांनी मांडला. त्यावर सुशांत नाईक यांनी नगराध्यक्षांना मानधन आहे मात्र उपनगराध्यक्षांना नाही का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आम्ही तुमच्या सारखंच सगळ्यांना वाटून देतो. असं सांगत टोला लगावला. या बैठकीत नगरसेवक विराज भोसले यांनी कणकवली नगरपंचायत च्या अर्थसंकल्पात पर्यटन महोत्सवासाठी दहा लाखाची तरतूद असून देखील नगरपंचायत चा निधी न घेताच महोत्सव यशस्वी केल्याबद्दल व गेली अनेक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा कणकवलीतील पुतळा सर्विस रस्त्यावर असताना तो स्थलांतरित करून यावर्षी शहरात उत्साहात शिवजयंती साजरी केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र यावेळी सुशांत नाईक यांनी श्री.भोसले यांना ही स्क्रिप्ट तयार करून दिलेली होती का? असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. या बैठकीत अर्थसंकल्पातील चर्चेपेक्षा या राजकीय टोलेबाजी व कोपरखळ्यांच्या चर्चे ची चर्चा मात्र खुमासदार झाली. व येत्या नगरपंचायत निवडणुकीचे संकेत देखील या चर्चेतून मिळाले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते सुशांत नाईक, संजय कामतेकर, अबीद नाईक, उर्वी जाधव, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, विराज भोसले, रुपेश नार्वेकर, शिशिर परुळेकर, माही परुळेकर, लेखापाल प्रियांका सोनसुरकर, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, किशोर धुमाळे, रुजुता ताम्हणेकर, सचिन नेरकर, सतीश कांबळे, आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!