कणकवली तालुक्यात सातत्याने विद्युत पुरवठा होतोय खंडित

संपर्क क्रमांक देऊन समस्या मांडा सांगणारे महावितरण गांभीर्य केव्हा घेणार?

अधिकाऱ्यांकडून नेहमीचीच उत्तरे

पावसाळा सुरू व्हायला अजून काही दिवस असताना पावसाळ्यात वादळी वाऱ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र यावर्षी पावसाळ्यापूर्वीच महावितरण कडून सातत्याने उन्हाळ्यात दिवसभरात अनेकदा विद्युत पुरवठा ठप्प होत आहे. मात्र याबाबत अधिकारी केवळ मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेत असल्याने उन्हाळ्यात कणकवली विभागातील नागरिकांना व जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज गुरुवारी सकाळपासून अनेकदा विद्युत पुरवठा ठप्प झाल्यानंतर याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र बघतो, पाहतो या पलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने उकाड्याच्या काळात जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता काही वेळापूर्वी पुन्हा एकदा विद्युत पुरवठा ठप्प झाल्यानंतर याबाबत विचारणा करण्याकरिता वायरमन, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता अशा अनेकांना फोन करावे लागतात. व यातून फोन करून अर्धा ते एक तास उलटेपर्यंत काही वेळा विद्युत पुरवठा सुरू होतो. अन्यथा नवनवीन कारणे दिली जातात. त्यामुळे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडून जनतेला वीज समस्यांबाबत तक्रारी मांडण्याकरता जे संपर्क नंबर दिले ते फक्त विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत फोन लावण्यापुरतेच आहेत का? पावसाळा सुरू होण्यापूर्वी सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असेल तर याबाबत वीज महावितरण च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गांभीर्य नाही का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे याबाबत महावितरण च्या कारभारात नक्की केव्हा सुधारणा होणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!