वैयक्तिक शेततळे योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्या

जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांचे आवाहन
जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहे, कोकण विभागासाठी जमीन धारणा अट शिथिल केलेली असून अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतः च्या नावावर किमान ०.२० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. हीच जमीनधारणा अट उर्वरीत महाराष्ट्रासाठी ०.६० हे. आहे. शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे,जमीनीचा सात-बारा आणि ८-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
लाभार्थीची निवड पुढीलप्रमाणे, शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet outlet / without inlet outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. सर्वसाधारण क्षेत्र व डोंगराळ क्षेत्रासाठी अनुदान मर्यादा वेगवेगळी असल्याने यापैकी आपले क्षेत्र कोणत्या भागात आहे त्यानुसार योग्य क्षेत्राची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.
विशेष सूचना, शेततळ्याचे खोदकाम झाल्यानंतर प्लास्टीकअस्तरीकरण करण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा. प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या ५० टक्के अथवा ७५ हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
लाभार्थ्यांची जबाबदारी, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. शेततळ्यासाठी online पद्धतीने अर्ज करताना अधिक माहितीकरीता संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी





