कणकवली प्रवासी संघाचे कार्य कौतुकास्पद

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन

गणेशोत्सवात प्रवाशांनी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ;सावकाश प्रवास करा , सुरक्षित घरी जा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध ठिकाणांहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी प्रवासी संघाने जनजागृती सातत्याने केली जात आहे. कै. मनोहर पालयेकर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम प्रवासी संघ करत आहे. त्यामुळे प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या वतीने आयोजित गणेश चतुर्थीनिमित्त चाकरमान्यांचे स्वागत कणकवली पटवर्धन चौक येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले. यावेळी संघाचे अध्यक्ष सखाराम सकपाळ, मुख्याधिकारी गौरी पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , आगार व्यवस्थापक मृदुला जाधव, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सुभाष राणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद लिमये , जिल्हा ग्राहक संघाच्या उपाध्यक्षा सुगंधा देवरुखकर, सहसचिव पुजा सावंत, पत्रकार उमेश बुचडे, प्रा.हरिभाऊ भिसे, सुभाष चव्हाण, जनार्दन शेळके, संजय मालंडकर,श्रध्दा कदम, राजाभाऊ परब, बाळा वाळवे, अमित मयेकर, ज्ञानेश पाताडे, अनिल परब, अनिल हळदिवे,प्रकाश दळवी, शेखर पेंडुरकर, विकास वरवडेकर आदींसह प्रवासी संघाचे पदाधिकारी, पेन्शनर संघाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त नगराध्यक्ष संदेश पारकर , माजी बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबईहून आलेल्या खाजगी बसेस व एसटी बसेसमधील प्रवाशांना व चालकांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प , माहितीपत्रक देत जनजागृती करण्यात आली.

मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या , प्रवासी संघाचे कार्य लोकहिताचे आहे. प्रवाशांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती केली जात आहे. कणकवली शहरात हा कार्यक्रम आयोजित करुन एक चांगला आदर्श प्रवासी संघाने केला आहे. प्रवाशांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

प्रवासी संघाचे अध्यक्ष सखाराम सकपाळ म्हणाले, प्रवासी संघाच्या माध्यमातून दरवर्षी जनजागृती प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केला जातो. कै.मनोहर पालयेकर यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. वाहनचालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवावे, यासाठी संघाकडून मार्गदर्शन केले जाते. गणेशोत्सवापूर्वी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचे दरवर्षी संघाच्या माध्यमातून स्वागत केले जाते.

पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले, प्रवासी संघटना ही प्रवाशांच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. गणेश भक्तांचे स्वागत करतानाच बस चालकांना व प्रवाशांना चांगल्या सुचना देण्याचे काम प्रवासी संघामार्फत सातत्यपूर्वक केले जात आहे.
आगारप्रमुख एस. टी. जाधव म्हणाले, प्रशासनाच्या गणेशोत्सव नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि जनजागृती केली जात आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष रमेश जोगळे तर आभार सचिव सुभाष राणे यांनी मानले.

error: Content is protected !!