विजयदुर्ग मधील ठाकरे सेनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते भाजपामध्ये

पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर, , मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. नारकर, पंचायत समिती सदस्य सौ. चव्हाण माजी सभापती रवी पाळेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना नितेश राणे म्हणाले की, गाव, वाडी, तालुका आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जनतेला चांगल्या प्रकारे समजले आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास ही भाजपची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विष्णू घाडी, जयेश नर, संदीप डोळकर व इतर कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी पक्ष घेईल, असा विश्वास दिला. कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांचे नेतृत्व घडविणे आणि त्यांना काम करण्याची संधी देणे ही भाजपची संस्कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात नव्याने दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य मान-सन्मान मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात हजारो कोटी रुपयांचे औद्योगिक प्रकल्प येणार असल्याचा दावा करत राणे म्हणाले की, या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक किंवा परराज्यात गेलेल्या युवकांना भविष्यात आपल्या गावातच रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील विकास आणि रोजगार वाढीसाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत बोलताना राणे यांनी सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असतील, अशी ग्वाही दिली. कोकणचा निसर्ग, आंबा, काजू आणि शेती यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची सरकार काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.
विजयदुर्ग परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विजयदुर्ग भागात भाजपला अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!