कणकवली तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात टोकन पद्धत सुरू

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी स्वतः ऑनलाईन केल्या जाणाऱ्या टेबलवर थांबून घेतला आढावा

गेली अनेक वर्षांची दाखल्यांसाठीची रांग झाली बंद

माजी आमदार वैभव नाईक यांनी केले होते आंदोलन

कणकवली तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर नुकत्याच झालेल्या गर्दीच्या व माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी या सेतू सुविधा केंद्राच्या ऑनलाईन केल्या जाणाऱ्या टेबलवर थांबून स्वतः आढावा घेतला. तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची कामे तातडीने करण्यात सोबतच रांगेमध्ये लोकांना उभे राहावे लागू नये याकरिता या ठिकाणी बुधवार पासून नव्याने टोकन पद्धत सुरू करण्यात आली असल्याची माहिती श्री देशपांडे यांनी दिली. कणकवली सेतू सुविधा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत या ठिकाणी नागरिकांना रांगेत राहावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राला भेट देत तेथील केंद्र संचालकाना जाब विचारला होता. बराच वेळ लोकांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागत असल्याकडेही लक्ष वेधले होते. तसेच यावेळी वैभव नाईक यांनी आढावा घेत असताना तेथील जनतेशी देखील संवाद साधला होता. या नंतर या साऱ्या प्रकाराची तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दखल घेत बुधवारपासून याबाबत कार्यवाही करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने श्री देशपांडे यांनी स्वतः सेतू सुविधा केंद्राच्या कागदपत्रे ऑनलाईन केल्या जाणाऱ्या टेबलावर थांबून आढावा घेतला. या सेतू सुविधा केंद्र मध्ये पहिल्यांदा असलेल्या ऑनलाइन सिस्टीम मध्ये काहीसा बदल करण्यात आला असून त्यामध्ये आता प्रत्येक प्रतिज्ञापत्र किंवा दाखल्याच्या कागदपत्रांना जोडण्यात येणाऱ्या अर्जदाराच्या कागदांवरील अर्जदाराची सही व आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करावे लागत असल्याने पहिल्यापेक्षा काही वेळ जास्त जात असल्याचेही यादरम्यान समोर आले. सदर सही व आधार कार्ड अपलोड केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे लोकांना या ठिकाणी रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागू नये किंवा त्रास होऊ नये याकरिता तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना व केंद्र संचालकांना सूचना देत या ठिकाणी टोकन सिस्टीम सुरू केली आहे. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे नंबर नुसार नाव ऑनलाइन करणाऱ्या टेबलवर येईल त्याची पुकारणी करून त्याचे काम मार्गी लावून घेतले जात आहे. या कार्यपद्धतीमुळे तहसीलदार कार्यालयातील गेले काही दिवस लागत असलेले रांग पद्धत बंद झाली असून यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे .त्यातच बुधवारी बकरीची सुट्टी असल्याचे कॅलेंडर मध्ये दाखविण्यात आल्याने तहसीलदार कार्यालयात काही प्रमाणात गर्दी कमी होती. मात्र ही सुट्टी आज गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी शुक्रवारपासून पुन्हा तहसीलदार कार्यालयात गर्दी होणार आहे. त्यामुळे शुक्रवार नंतरच या टोकन पद्धतीचा खऱ्या अर्थाने जनतेला होणारा फायदा दिसून येणार आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!