‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ घाट मार्गासाठी खासदार नारायण राणे आग्रही;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुखकर व्हावे, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक ‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ या घाट मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन, त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करावे, अशी आग्रही मागणी राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार राणे यांनी ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात या घाट मार्गाचे दूरगामी फायदे विशद केले आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यास वेंगुर्ले ते कोल्हापूर दरम्यानचे अंतर तब्बल ४० ते ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत दीड ते दोन तासांची मोठी बचत होईल. विशेष म्हणजे, हा केवळ ५ किलोमीटरचा घाट रस्ता असल्याने इतर घाट मार्गांच्या तुलनेत तो अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.
हा मार्ग केवळ प्रवासासाठीच नव्हे, तर कोकणच्या अर्थव्यवस्थेसाठीही जीवनवाहिनी ठरू शकतो, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे. या मार्गामुळे ताजे मासे अत्यंत कमी वेळेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत पोहोचवणे शक्य होईल, ज्यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा फायदा होईल. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये एक नवीन पर्यटन साखळी निर्माण होईल. या विकास प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक विकासाला गती मिळेल, असे खा.राणे यांनी म्हटले आहे.
शिवकालीन ऐतिहासिक वारसा
‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ हा मार्ग शिवकालीन काळापासून प्रचलित असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर ‘वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता कृती समिती’ने केलेल्या निवेदनाची दखल घेऊन राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता द्याव्यात आणि हा जनहिताचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

error: Content is protected !!