स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव !

यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन
झाराप येथे खास गावसभा
गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते असे मार्गदर्शन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झाराप ग्रामपंचायत येथे केले स्वच्छ व हरित थीमसाठी झाराप ग्रामपंचायतचे राष्ट्रीय स्तरावर नामांकन होणार आहे. ही ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या गावाची पाहणी करण्यासाठी पुणे येथील यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली खास गावसभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, ग्रामपंचायतचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, पाणी व स्वच्छता विभागचे सेवानिवृत्त अधिकारी विनायक ठाकूर, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य जिजा तेली, सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामसेवक सतीश साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्य सेविका, कृषीसहायक व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते. पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करा आणि स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. गाव स्वच्छ होताना ग्रामस्थाची मनेही स्वच्छ झाली पाहिजेत. मोठी झेप घेण्यासाठी दहा पावले मागेही येता आले पाहीजे. भगीरथ संस्थांच्या माध्यमातून स्वच्छते बाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती, सेंद्रिय शेती, सौरऊर्जा वापर आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी केली जात आहे, असे डॉ. प्रसाद देवधर यांनी सांगितले. झाराप गाव स्वच्छ व हरित गाव संकल्पना भविष्यातील शाश्वत विकासाचा रोल मॉडेल होईल असा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला.
सरपंच दक्षता मेस्त्री यांनी गावातील लोकांचे आरोग्य सुधारावे आणि प्लास्टिकमुक्त गाव असावे, या ध्येयाने प्रेरित होऊन सर्वांच्या सहकार्याने हे सहज शक्य होईल. असे मत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी थेट झाराप गावच्या ग्रामपातळीवरील कामांची पाहणी केली आणि ग्रामसेवक व सरपंचांना शाश्वत विकासासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.





