दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी 11 जणांना सशर्त जामीन

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई, ॲड. भूषण बिसुरे, ॲड. सुहास साटम यांचा युक्तिवाद

दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी सदर गाडी अडवून ५० ते ६० लोकांच्या जमावाने गाडी फोडत आतील मांस रस्त्यावर फेकले. यावेळी स्विप्ट चालक निजामुद्दीन कुरेशी याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत व पोलीस कर्मचारी श्री. सावंत याला मारहाण करत गाडी पेटवून दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अकराजणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
यात महेंद्र खरवत, वैभव रेडकर, विजय कांबळे, विशाल चव्हाण, आनंद तळणकर, पराशर सावंत, गणपत डिंगणेकर, जयदेव उर्फ राज कलबेकर यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत व ॲड. भूषण बिसुरे तर चेतन चव्हाण, दिपक उर्फ रामा गवस व प्रदीप गावडे यांच्यावतीने ॲड. संग्राम देसाई व ॲड. सुहास साटम यांनी काम पाहिले.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास बेळगाव येथून गोवा पासिंगची स्विफ्ट कार वीजघर चेक पोस्टवर आली. यावेळी गाडीमध्ये एकूण ४९ धडे असलेले सुमारे २८० किलो कातडी सोललेले मांस दिसून आले. सदरचे वाहन चौकशी करिता दोडामार्ग पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना पाताळेश्वर मंदिराजवळ ५० ते ६० लोकांचा जमावाने त्यांची चारचाकी व दुचाकी वाहने आडवी लावत सदरचे वाहन अडविले. त्यातील मांस बाहेर फेकून स्विप्टचालक कुरेशी आणि पोलीस कर्मचारी परशुमार सावंत यांना जबर मारहाण केली. त्यानंतर जमावाने सदरचे वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले.
याप्रकरणी दोडामार्ग पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी श्री. सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह ६० जणांवर शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव व हल्ला करणे तसेच मृत्यू येईल अशी मारहाण करणे, जबर दुखापत करणे, स्पोटक सदृश्य वस्तूचा बेकायदेशीर वापर करणे, आग लावणे, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
या संशयीतांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले आहे. त्यानंतर संशयितांच्यावतीने न्यायालयात दाखल जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीत ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करताना सरकारी पुराव्यात ढवळढवळ करू नये, फिर्यादीं व पिडीतांशी संपर्क साधू नये, असा गुन्हा पुन्हा करू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!