आंब्रड येथील ८७ वर्षीय मधुसूदन दळवी यांचा आगीत होरपळून मृत्यू
कुडाळ : आंब्रड मोगरणेवाडी येथील ८७ वर्षीय मधुसूदन दत्तात्रय दळवी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपल्या काजूच्या बागेला लागलेली आग विझवताना ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना आज सकाळी ६.३० वाजता निदर्शनास आली.
या घटनेबाबत त्यांचा मुलगा किशोर मधुसूदन दळवी (वय ५५) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार, त्यांच्या आंब्रड मोगरणेवाडी भाटी येथील भागातील काजूच्या बागेला आग लागली असल्याची माहिती त्यांना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास समजली. यानंतर ते खालच्या बागेत गेले व आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान त्यांचा तोल जाऊन ते नजीकच्या खोलगट भागात पडले व त्याच ठिकाणी आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मधुसूदन दळवी हे घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध सुरू होता. हा शोधा शोध सुरू असतानाच मोगरणेवाडी भाटी येथील एका खोलगट भागात त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आला. त्यांना ऐकायला कमी येते तसेच ते मूकबधिरही आहेत. त्यामुळे या घटने दरम्यान त्यांना ओरड करणे शक्य झाले नाही. तसेच या भागात कोणाची त्यादरम्यान रहदारी नसल्याने ही घटना कोणाच्याही निदर्शनास आली नाही. शोधाशोध करत असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेहच जळालेल्या अवस्थेत मिळून आला.
यानंतर त्यांचा मुलगा किशोर मधुसूदन दळवी यांनी शनिवारी कुडाळ पोलीस ठाण्यात या घटनेबाबतची फिर्याद नोंदवली असून या घटनेची कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार पाटील व पोलीस शिंगाडे यांनी जाऊन पंचनामा केला अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ