राष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा – डॉ.महेंद्र मोहन

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराला गोपुरी आश्रमात प्रारंभ
राष्ट्र सेवा दल म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा आहे. लहान वयातच मुलांच्या मनावर समतेचे संस्कार बिंबवणे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून केला जातो. कुठल्याही धर्मात जरी जन्म झाला असेल तरी खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण या शिबिराच्या माध्यमातून दिली जाते असे प्रतिपादन वात्सल्य मंदिर ओणीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुजर यांनी केले. अद्वैत फाऊंडेशन कणकवलीच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर उदघाटन प्रसंगी डॉ.महेंद्र मोहन गुजर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अद्वैत फाऊंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण,गोपूरी आश्रम चे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर, राष्ट्र सेवा दल प्रशिक्षक शहाजी माटुंगे, भालचंद्र मेस्त्री, मुग्धा कुळये, बाबनी मापारी, विद्या राणे, आशाताई गुजर,हरिश्चंद्र सरमळकर, वैभव कोराणे, विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते. अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने गोपूरी आश्रम वागदे येथे ९ ते १३ मे दरम्यान राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण करण्यात आले. शिबिरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी मुंबई, तसेच गोवा राज्यातील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर म्हणाले की,चांगल्या विचारांचा, चांगल्या आचारांचा आणि चांगल्या कृतीने वागणारा माणूस होणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने सरिता पवार आणि राजन चव्हाण गेली 10 वर्षे सलग राष्ट्र सेवा दलाचे शिबीर कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गोपूरी आश्रम मध्ये आयोजित करत आहेत. अप्पासाहेब पटवर्धन यांना अभिप्रेत समतेची शिकवण या शिबिरातून दिली जात आहे. भावी समाजाला घडविणारी आदर्श पिढी यातून निर्माण होईल. स्वावलंबन म्हणजे काय याचे धडे या ठिकाणी शिबिरार्थीना मिळतात. सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाच्या शिबीर हे वेगळे रसायन असते. माणूस घडविणारी ही कार्यशाळा आहे.मनोरंजन, बौद्धिक खेळ, शिस्त आणि स्वावलंबनच्या कृतिशील उपक्रमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जातात. गोपुरी आश्रमाच्या निसर्गरम्य वातावरणात हे शिबीर संपन्न होत आहे. या शिबिरातील अनुभवाची शिदोरी भावी आयुष्यात शिबिरार्थीना चांगला माणूस म्हणून जगण्यास उपयोगी ठरणार आहे. प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन सरिता पवार यांनी केले.