रामेश्वर संस्थानच्या गणपतीला भक्तीपूर्ण वातावरणात निरोपविसर्जन मिरवणूकीला भाविकांचा लोटला जनसागर

आचरा–अर्जुन बापर्डेकर

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या गणपतीला मंगळवारी ३९दिवसांनीभावपूर्ण वातावरणात सायंकाळी निरोप देण्यात आला. आणि गेले ३९दिवस विविधांगी कार्यक्रमानी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली.एकोणचाळीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते.यात किर्तन,दशावतार, फुगडी स्पर्धा, पारंपरिक, आमनेसामने डबलबारी भजनाचे सामने, रेकॉर्ड डान्स स्पर्धा,गृपडान्स स्पर्धा, व्हरायटी शो,आर्केस्ट्रा, यासोबतच प्रथमच शक्तीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. मंगळवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरा सोबत पारवाडी बेंजो पथक, आचरा बीटसू बेंजो पथक यांच्या तालावर आचरा तिठा,बाजारपेठ मार्गे नेत सायंकाळी गाउडवाडी येथून पिरावाडी महिला ढोलपथकाच्या साथीने पिरावाडी चव्हाटा येथून समुद्र किनारी नेण्यात आली. ठिक ठिकाणी भाविकांनी तोरणे, रांगोळी काढत, फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केलेहोते.आचरा वासियांतर्फे मिरवणूकीत सहभागी भाविकांसाठी थंड पाणी, लाडू मोदकाचे वाटप केले जात होते.बालगोपाळ मंडळाच्या मिकी माऊने या मिरवणूकीत रंगत आणली होती. या मिरवणूकीत पर्जन्य राजानेही हजेरी लावत पर्जन्य वृष्टी केली .
सायंकाळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात साश्रू नयनांनी पिरावाडी
येथील समुद्रात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी अलोट गर्दी केली होती.आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी मिरवणूकीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!