मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा संपन्न

सिंधुदुर्गनगरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानअंतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या स्मरण प्रीत्यर्थ ‘अमृत वाटीके’ची निर्मिती केली जाणार आहे. या अमृत कलश यात्रेची सांगता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या अभियानाच्या अनुषंगाने आज नगर विकास विभाग, सिंधुदुर्ग मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड-जामसंडे, कुडाळ, कसई-दोडामार्ग व वाभवे-वैभववाडी या आठही नागरी भागातील मातीने भरलेल्या अमृत कलशांची सिंधुदुर्ग नगरी येथे ढोलताशांच्या गजरात उत्सवी वातावरणात अमृत कलश यात्रा संपन्न झाली. सर्व शहरांच्या अमृत कलशांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सर्व कलशांतील माती जिल्हास्तरीय कलशात एकत्रित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे, परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, जिल्हा सह-आयुक्त श्री अजयकुमार एडके, मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, देवगड-जामसंडे मुख्याधिकारी सूरज कांबळे, एनसीसी चे लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत. सर्व नगरपालिकांचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.