सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली करू देणार नाही

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा इशारा
अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील
जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम.एच.०७ पासिंगच्या वाहनांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत ओसरगाव येथील टोल सुरू करण्यास आमचा विरोध राहणार आहे. प्रशासनाने आमची मागणी मान्य न करता टोल सुरू केल्यास होणाऱ्या परिणामास आम्ही जबाबदार राहणार नाही.पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल असा इशारा माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी निवेदनातून दिला आहे.
मिलिंद मेस्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई – गोवा मार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे झालेला टोल नाका उद्या दिनांक १४ जून २०२३ रोजी सुरू होणार आहे, असे प्रसार माध्यमाद्वारे समजते. परंतु राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवेचे काम अजूनही प्रलंबित आहे. जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय टोल नाका सुरू होऊ देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांची असलेली एम. एच. ०७ माफीची मागणी तसेच भूसंपादनाचे पैसे व टोल नाक्यावरील असणारे सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह पूर्ण होत नाही. तोपर्यंत कोणताच टोल सुरू करू देणार नाही. विशेतः एम.एच.०७ च्या गाड्यांना माफी मिळत नाही तो पर्यंत टोल सुरू झाल्यास होणाऱ्या परिणामाला प्रशासन जाबाबदार राहील. असा इशारा माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी दिला आहे.
कणकवली प्रतिनिधी