देवगड मधील “त्या” विवाहितेच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करा!

आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची डीवायएसपींच्या कार्यालयावर धडक

अन्यथा महिला आघाडी देवगड मध्ये आंदोलन छेडणार

देवगड तालुक्यातील किंजवडे येथील विवाहितेची हत्या करून कुटुंबीयांना माहिती न देता मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत आमदार वैभव नाईक यांच्यासह मृत संजना परब यांच्या कुटुंबीयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले. व या प्रकरणाची विशेष चौकशी करा अशी मागणी केली. याबाबत श्री. कांबळे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कडून माहिती घेतो व आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करतो असे आश्वासन ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला याप्रसंगी दिले. याबाबत त्या मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संजना सागर परब (लग्नागोदरचे नाव मालिनी गंगाराम कदम), रा. किंजवडे, भरडवाडी हिचा ५ वर्षापूर्वी श्री. सागर परब, रा. किंजवडे भरडवाडी यांच्याशी प्रेम विवाह झाला होता. या लग्नास सागर परब यांच्या आई वडिलांची परवानगी नव्हती. लग्नानंतर संजना हिला सासरे विलास परब, सासू लक्ष्मी परब, नवरा सागर परब, नणंद कोमल पुजारे, अजय पुजारे यांच्याकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. सदर बाबत सासरी होणारा जाचाबाबत तिचा पती सागर परब व सर्व कुटुंबियांच्या भीतीने तिने माहेरी याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती. बुधवार दि. १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता संजना परब यांची हत्या करण्यात आली. याबाबत किंजवडे गावाचे सरपंच यांनी अर्जदार यांचे शेजारी प्रकाश परब यांना संजना परब हिला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असल्याचे संजना हिच्या आई वडील यांना कळविण्यास सांगितले. सदर बाबत अर्जदारांना माहिती झाल्यानंतर संजना परब हिला रुग्णालयात पाहण्यासाठी मी स्वतः व माझ्यासोबत माझी पत्नी गीता गंगाराम कदम व शेजारी गेलो. असे या अर्जात म्हटले आहे. यावेळी आम्हास कोणतीही कल्पना व पूर्वसूचना न देता संजना हिला थेट पोस्टमार्टम करण्यासाठी नेण्यात आले. व त्यानंतर संजना हिचा मृतदेह तिचे भाऊ येई पर्यंत दहन न करण्याचे सांगून सुद्धा किंजवडे गावचे सरपंच, पोलीस पाटील व तीच्या सासरच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने मृतदेहाचे दहन केले. असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच हा आरोप उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर देखील चर्चेवेळी करण्यात आला. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करा. अन्यथा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी देवगड मध्ये आंदोलन छेडेल व याबाबत महिला आयोगाकडे देखील दाद मागली जाईल असा इशारा देण्यात आला. या हत्ये प्रकरणाचे निवेदन गंगाराम कदम यांनी डी वाय एस पी ना दिले असून यावेळी रविंद्र जोगल, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, दिव्या साळगावकर, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह अन्य ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!