…तर मग नुसते आरोप करण्यामागचा उद्देश काय ?

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा आमदार निलेश राणेंना सवाल

महाराष्ट्राच्या सरकार मधिल सत्ताधारी पक्षाचे आमदार निलेश राणे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रकार परिषदा घेऊन न्याय मागत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जावे. कुंपणच जर का शेत खात असेल आणि कुंपणाचा मालकच केवळ आरोप करणार असेल तर मग यावर कारवाई नेमकं कोण करेल असा प्रश्न पडतो. अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या घरातच पालकमंत्री व खासदार असताना पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक दहीकर यांच्यावर केवळ आरोप करण्याचा नेमका उद्देश काय असा सवाल कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, काल ३० मे रोजी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. जर का निलेश राणे हे केलेल्या आरोपांवर ठाम असतील व त्यांच्याकडे याबाबत ठोस पुरावे असतील तर त्यांनी त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नुसती बदलीची नाही तर बडतर्फची कारवाई आपल्याच सरकारमधील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडून करून घ्यावी.
स्वतःच्याच घरात पालकमंत्री व खासदार असताना आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केवळ आरोप करून भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास कमी होणार आहे का. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील दैनिक तरुण भारतला मुलाखत देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बड्या अधिकाऱ्यावर तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याची कबुली स्वतः रवींद्र चव्हाण यांनी दिली होती पण त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे निलेश राणे यांनी केवळ आरोप करून काही उपयोग होणार नाही. निलेश राणे यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये ज्या अवैध वस्तूंच्या वाहतुकीकरता वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे नंबर जाहीर केले, त्या गाड्या नेमक्या कोणाच्या आहेत व त्या आपल्याच मित्र पक्षाच्या संबंधितांच्या असतील तर ठोस कारवाई करायला पोलीस प्रशासनाला भाग पाडणार का, असाही सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

error: Content is protected !!